नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, May 31, 2020

कोरोना आहे आज अजुनी


उद्यापासून सुरु होणा-या लाॅकडाऊन ५.० चे स्वागत आमच्या पध्दतीने 💐
( गाणे: तरुण आहे रात्र अजुनी)

'कोरोना' आहे आज अजुनी
लाॅक-डाऊन वाढलाच ना रे
एवढ्यातच त्या  गल्लीतून
तू असा वळलास का रे?

कोरोना' आहे आज अजुनी

अजुनही दिसल्या न सदनी
बालकांच्या स्कूलगाड्या
अजून मी दिसले कुठे रे?
पण तू दिसलास का रे?

कोरोना' आहे आज अजुनी

बघ तूला दिसतोच आहे
'चायनाचा' विषाणू सारा
'क्वारंटाईनच्या'  कृतीचा
गंध तूला पाहिजेल का रे?

कोरोना' आहे आज अजुनी
लाॅक-डाऊन वाढलाच ना रे
एवढ्यातच त्या  गल्लीतून
तू असा वळलास का रे?

#विडंबन_एकवेळ_सहन_कराल_
पण_विलगीकरण_नको
#घरात_रहा_सुरक्षित_रहा ✌🏻

( मनाने नेहमीच तरुण) अमोल 📝
३१/०५/२०२०
poetrymazi.blogspot.in

Saturday, May 30, 2020

चायनीज प्रणाली


सध्या सगळ्या शाळा/क्लासेस झुम वर आहेत.

पण झूम तर चायनीज आहे  😏

शेठजी, आरोग्य सेतू सारख द्या काहीतरी?

नाव सुचवू?

खडू(स) फळा?

नाही आवडलं ?

प्रकाशाच्या स्मृती?

हे पण नाही आवडलं?

मग त्यांनाच विचारा 😷

शेवटच एकच शेठजी

'आत्मनिर्भर कळा' आपलं फळा

हो देतो मोबाईल माहित आहे २ ला तुझा क्लास आहे झुम वर

 शेठजी, जरा लवकर 🙏🏻

( जरा गंमत)  📝😊

Sunday, May 24, 2020

बायपास रोड


बायपास रोड

आजकाल कुठल्याही शहराला एक गोष्ट निर्विवाद पणे चिकटलीय ती म्हणजे त्या शहराच्या बाजूने जाणारा 'बायपास रोड'. ज्यांना या गावात काम नाही,पुढे जायचे आहे, शहरातील वाहतूक चक्रात न अडकता, वेळेशी सांगड घालत, पुढे जायचा एक उत्तम पर्याय. 'ज्या गावी मला जायचं नाही, त्याचा विचार का करायचा? ' या म्हणीला साथ देणारा  कुठलाही 'बायपास किंवा रिंग रोड' आज आपण सगळीकडे बघतो. उपयुक्तता, गरज यात काहीच प्रश्ण नाही
पण खरं सांगू या 'बायपास रोडने' प्रवासाची मजा गेलीय. अस्स्ल  प्रवासी माझ्या या मताशी ठाम असेल. प्रवास ही काय गडबडीत/ भरभर करायची गोष्ट आहे का? स्वतः ची गाडी घेऊन जाणारे समजू शकतो पण आजकाल आमच्या 'लाल प-या' पण बायपास करत जातात. अर्थात त्यांना ही स्पर्धेच्या युगात टिकाव धरायचा असल्याने हे सगळं करण गरजेचे आहे म्हणा.

पण जिथे ११-१२ तास प्रवासास लागायचे तिथे ६ तासात प्रवास संपवायचा?  😕

चला यानिमित्याने  मुंबई-  सांगली ( खाडी पूल मार्गे ) कुठलाही बायपास न घेता आज फिरुन येऊ.
सकाळी ७. ठिकाण: मुंबई सेंट्रल
चला बसले का सगळे, टिंग टिंग

एक , सांगली द्या,  किती पर्यत पोचेल काका. 
सात पर्यत पोहोचेल, तिकीट निट ठेवा. पुण्यात चेक होते बर का!

दादर,सायन,चेंबूर करत वाशी खाडी पूल आला की मुंबईतील
 वा-याची झुळुक ( पहिल्यांदाच) अनुभवून खिडकीला डोके टेकवून जी मस्त झोप लागायची ती 'पनवेल' स्थानकावर ' पाच मिनिटे बस थांबेल' जाऊन यायचं त्यानी जाऊन या, या मास्तरांच्या आवाजानेच जाग यायची. ( कळंबोलीहून जाणारा पनवेल बायपास - एकस्प्रेस वे चुकवला बरं का आपण) 
उतरुन एक- दोन पेपर आणि नंतर वाचायला चित्रलेखा, साप्ताहिक सकाळ यापैकी एक मासिक घेऊन पुढचा प्रवास सुरु.

पनवेल ते खोपोली बस ब-यापैकी भरलेली. साधारण तासात उजव्या बाजूला दिसणाऱ्या  महड च्या बाप्पांना नमस्कार करुन खोपोली.

 १०-१५ मिनिटे नाष्ट्यासाठी खोपोलीत थांबायचे का लोणावळा हा सर्वस्वी चालक-वाहक काकांचा निर्णय असायचा. पण नाष्ट्यासाठी बस कुठेही थांबली तरी गरम- गरम वडा पाव वर आम्ही कधीच अन्याय होऊ दिला नाही 😃

बोर घाट , घाटांचा राजा. खोपोली कडून घाट चढण्याचा थरार काही वेगळाच. या सगळ्याचा आनंद घेत लोणावळा स्थानक. मग पुढे बस पुण्याकडे रवाना.

इथे और एक डुलकी तो मंगता है न बाबा! पुण्याबद्दलचे प्रेम/ आपुलकी का माहित नाही ओण देहू रोड / निगडी आलं की आपोआप जाग यायची ( कात्रज बायपास केंव्हाच बायपास केला आपण) . मग चिंचवड- पिंपरी- खडकी- शिवाजीनगर- डेक्कन- लकडी पूल- टिळक रोड - ते स्वारगेट. तासभर मस्त जायचा.

स्वारगेट ला मात्र 'लाल परी ' बराच वेळ थांबायची. याचे कारण चालक- वाहक इथे बदलायचे, बस सांगली फलाटावर लावण्यापूर्वी स्वारगेट आगारातून डिझेल भरुन यायची. सकाळी कंटक्टरने जे सांगीतलेले असायचे की तिकीट जपून ठेवा, पुण्यात चेक होईल हे इतके डोक्यात असायचे की नवीन कंडक्टर येऊन नवीन पॅसेंजरचे तिकीट काढून परत त्यांच्या ठिकाणी बसले तरी लक्ष सारे खिशातील तिकीटाकडे आणि कंडक्टर आपल्याला तिकीट दाखवा असे केंव्हा विचारतात याचकडे लागलेले असायचे.

दुपारी १:३० च्या सुमारास बस स्वारगेट हून सांगलीकडे निघते.
( काय हे एवढ्या वेळात बेलापूर हून निघून बायपास घेतले असते तर एव्हान सांगलीला पोचला असता की राव 😐)

सारसबागेतील गणपतीला उजवीकडे बघून एक नमस्कार आणि शंकर महाराजांच्या मठाकडे डावीकडे बघून नमस्कार करुन बस कात्रज घाटाकडे निघते. कात्रज बोगद्याच्या आधीच्या वळणावर दिसणा-या पुण्य नगरीचे शेवटचे दर्शन घेऊन बस कात्रजच्या बोगद्यात शिरते. 

पनवेलला घेतलेला पेपर शेजारचा प्रवासी वाचायला मागतो तेंव्हा लक्षात येते अरे आपण प्रवासात वाचायला पण घेतलयं मग शिरवळ स्थानकात उसाचा रस पिऊन हातातले मासिक वाचत, खंबाटगी घाटातील रुक्ष डोंगर बघत चहा प्यायला सातारा स्थानकात उतरायचं ( अरे, सातारा बायपास सोडला का आपण?  )

संपूर्ण मुंबई - सांगली प्रवासात कुठल्या टप्पात बसमधे जास्त गर्दी असेल तर ती सातारा- कराड. एकदम फूल्ल बस, उभा रहायला जागा नाही. कराड जवळ कोयनेचा पूल ओलांडला की मग सांगली जवळ आली असं वाटायचं.  मग पहिल्यांदाच हायवे पासून बस कराडला स्थानकात जाते आणि परत त्याचमार्गे परत येते हे आणि अर्धातास त्यात वाया जातो हे नको वाटायच. कारण एकच सांगलीची ओढ. 

पुढे मुख्य हायवे सोडून पेठ नाक्याला बस वळली की तोपर्यंत मन मात्र ४० किमी पुढे पोहोचलेले असायचे. इस्लामपूर, आष्टा हे थांबे मात्र घरी जाण्यापूर्वी वाटेत शेजा-यांकडे आधी डोकावल्यासारखे वाटायचे. त्यात एखादे अजोबा बस मधून उतरले असतील आणि त्यांच्या परत येण्यासाठी अख्खी बस खोळंबली असली तरी काही वाटायचे नाही.

१०- ११ तास प्रवास झाल्यावर शेवटच्या तासातला प्रवास मात्र संपता संपायचा नाही. मात्र तो क्षण हुरहुर लावायचा जेंव्हा पश्चिमेच्या मावळत्या सुर्याच्या साक्षीने  आयर्विन पुलावरुन, कृष्णा माईला वंदन करुन, डावीकडे श्री गणपतीचे दर्शन , तर उजवीकडचा विष्णू घाट डोळ्यात साठवून हरभट रोड, नगरपालिका, तरुण भारत करत लालपरी बरोबर सातच्या सुमारास सांगली स्थानकात स्थानापन्न व्हायची. मग न्यायला आलेल्या बाबांबरोबर पुढचा घरापर्यतचा प्रवास 🤗

मंडळी, आवडला का हा बायपास न घेता केलेला प्रवास

पण खरं सांगू, जीवनाच्या प्रवासात काही काही गोष्टी 'बायपास' केलेल्याच चांगल्या ना?

( प्रवासी)  अमोल 📝
२५/०५/२०२०

माझे अंगण


माझे आंगण...

काही दिवसापूर्वी एका राजकीय पक्षाने ' माझे आंगण, माझे, xxxx असा काहीतरी सोहळा केला.

अहं ! लेखनाचा हा विषय नाही. तुम्हाला माहितच आहे राजकीय गोष्टी, मुद्दे, प्रतिक्रिया यापांसून मी किती लांब असतो ते. परत परत मला सांगायला लावू नका☺.

आपण फक्त चांगल घ्यायचं

तर 'माझं अंगण ' हे  शब्द मला लेखनासाठी विषय सुचवून गेले. ज्योतिषा ने 'भविष्यकाळात' रमावे, लेखकाने मात्र वारंवार 'भूतकाळाच्या' अंगणात डोकावून 'वर्तमानातील' रसिकांना छान छान गोष्टींची आठवण करुन द्यावी या मताचा मी आहे त्यामुळे भूतकाळातील अंगणात माझ्या जरा जास्तच फे-या होतात. असो.
तर 'माझे अंगण' ऐकून

'अंगणी माझ्या मनाचे,मोर नाचू लागले' असं म्हणलं तर वावग ठरणार नाही.

साधारणपणे गावाकडे कुठले ही घर म्हणले की 'अंगण' हा त्याचा अविभाज्य घटक असतोच. अर्थात पुणे-मुंबई किंवा इतर महानगरात ही ज्यांचे स्वतंत्र बंगले आहेत त्यांच्याकडे 'अंगण' असतेच म्हणा. पण अपार्टमेंट मधे राहणाऱ्या आमच्यासारख्यांना सोसायटी समोरच्या ( असलीच तर )ओपन स्पेसला 'अंगण ' म्हणणे माझ्यातरी जिवावर येतं

म्हणून गावाकडचे घर , सभोवतालचे 'आंगण' हे मला विशेष वाटते. आता आंगण म्हणले की तिथे खेळलेले खेळ वगैरे ओघाने आलेच.

माहेरवाशीणींच्या अनेक गाण्यातून 'अंगण' दिसून येते
उदाहरण बघा ना
' ऐलमा पैलमा गणेश देवा' या हदग्याच्या  गाण्यातील अनेक कडव्यात 'अंगणात रंगली ग माहेरची गाणी' असा उल्लेख येतो.

तुळशीचे लग्न, घरातील मंगल कार्यानिमित्य घातलेला मांडव याने वेगळे वाटणारे आंगण अशी अंगणाची विविध रुपे आपण बघतो तरी दिवाळीत ते जरा जास्त खुलते ना? मुलांनी बनवलेले किल्ले, रांगोळ्या, रात्री लावलेल्या पणत्या आणि नातेवाईंकाच्या गप्पागोष्टीत रंगलेले अंगण

दिवाळी येणार,अंगण सजणार
आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन तुमच्याघरी

हे ही एक गाणे

निळेसावळे ओले अंगण
तुझ्या नी माझ्या मनात श्रावण
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी

अनेक कवितांधूनही 'अंगण' डोकावते:-

माझ्या ग अंगणात, थवे फुलपाखरांचे
गोल गोल रिंगणात,गाणे फिरते रंगाचे

फुलपाखरावरुन आठवलं मंडळी, अंगण म्हणले की त्याचा अविभाज्य भाग म्हणजे सभोवतालची बाग. त्या बागेत हौसेने लावलेली वृक्षवल्ली आणि त्यावर बागणारी छान छान फुलपाखरे.

'व्यक्ती तितक्या प्रकृती' असतार त्याचप्रमाणे प्रत्येक घराची एक खास बाग असते. इतर अनेक कलांसारखीच 'बागकाम' ही पण एक कला आहे आणि ती सहजासहजी कुणाला जमणारी नाही. त्याची ही आवड पाहिजे. पत्रिकेत चतुर्थ स्थानावरुन 'घराचा' योग पाहतात पण त्या चतुर्थ स्थानात शुक्र, चंद्र वगैरे असले की त्याच्या घरा भोवतीची बाग ही अतिशय सुरेख असणारच.

आता अपार्टमेंट मधे राहणारे आणि बागकामाची आवड असणारे नाइलाजाने आपल्या गॅलरीत, बाल्कनीत झाडे लावून आपली हौस भागवतात. मग तळ मजल्यावर राहणाऱ्या आमच्या सारख्याना वरुन टपक टपक गळणाऱ्या पाण्याने सकाळ /संध्याकाळ अभिषक होतो ही गोष्ट वेगळी 😃

आमच्या साखर कारखान्याच्या घरच्या अंगणात आम्ही बागकाम केले. आपुलकीने जी झाडे तरली ती तरली. हेच पलिकडे आमच्या निलेश च्या ( डोर्ले ग्रुप, अरिहंत फार्मा) घरची बाग मात्र अतीशय दृष्ट लागावी एवढी सुंदर. घराचे नाव पण किती समर्पक 'सावली' 🏡

अशी अनेक घरे ( यात तुमचे सध्याचे/ पुर्वीचे/ किंवा तुम्ही बागकाम केलेली)  तुम्हाला हा लेख वाचून आठवतील आणि तुमच्या अंगणात पडणा-या तुमच्या बागेतील अनेक टपो-या फुलांप्रमाणे तुमचे मन या आठवणीत परत तरतरीत व्हावे ही माफक इच्छा

आमच्या 'गायत्री ' बंगल्यावर
 दरवर्षी मे महिन्यात न चुकता फुलणारा ' मे फ्लाॅवर,

घराच्या गच्चीवर हौसे खातर बेळगाव जवळील खानापूर हून आणलेल्या ४०-५० वेगवेळ्या गुलाबाच्या ठेवलेल्या कुंड्या

गणपती च्या आधी 'गौरीच्या फुलांनी' सजणारी बाग

सदा फुलणारा 'मदनबाण'

आणि  साखर कारखाना चालू झाला की अंगण-घर- गॅल-या- गच्चीत पसरणारी 'काळी राख'

या आठवणी कायमच्या

लेखनाचा शेवट आवडत्या गाण्यातील या ओळीने

"हे विश्वाचे अंगण
आम्हा दिले आहे आंदण"

( अंगणातच जास्त रमणारा) अमोल 📝
२४/०५/२०२०
poetrymazi.blogspot.in

ता.क :- ब-याच ठिकाणी अंगण/ आंगण असे  दोन्ही उल्लेख आलेत. योग्य शब्द तुम्हीच समजून घ्या. भावना त्याच आहेत ☺

Saturday, May 23, 2020

लिहिण्यास कारण की.


(पत्र) लिहिण्यास कारण की...📝

महोदय,

आपणा सर्वांस अमोल केळकरचा नमस्कार 🙏🏻
खुपदिवसांनी पत्रासारखे काहीतरी लिहायचा प्रयत्न करतोय. यापूर्वी शेवटचे पत्र बहुतेक दहावीला मराठीच्या पेपरातच लिहिले होते. त्याआधी प्रत्यक्ष पत्र पोस्टकार्डावर किंवा अंतर्देशीय पत्रावर केंव्हा लिहिलेले हे आता आठवतही नाही.

नोकरी लागण्यासाठी अर्ज करण्यासाठी 'इमेल' ने आपले साम्राज्य पसरवून सोय केली होती. त्यानंतर मात्र 'बाॅर्डर' सिनेमातील 'संदेशे आते है' या गाण्याने पत्र आठवली

अगदी अलिकडे 'चला हवा येऊ द्या' मधून सागर कारंडे पत्र सादर करायचा ते आवडायला लागले.

मंडळी या लेखनाचा उद्देश मात्र अगदी वेगळा आहे बरं का. पत्र लेखनातील शेवटची ओळ साधारण कशी असते तर

कळावे लोभ असावा ही विनंती
आपला विश्वासू किंवा आपला  स्नेही अशी सर्वसाधारण पणे लिहायची पध्दत.  अगदी इंग्रजीत लिहिलेला अर्ज असेल किंवा आजकाल वेगाने होणारे संदेश प्रक्रियेतील इमेल असतील तर
Thanks & Regards
 किंवा
Your's Faithfully किंवा Your's Truly या वाक्यांनी आपण लिखाणाचा शेवट करुन आणि खाली आपले नाव / सही  करतो. माझ्यामते हे ब-यापैकी सगळ्यांना मान्य होईल.

मात्र आपले नाव लिहिण्याआधी एक विशेषण लिहायचा एक ट्रेंन्ड/ प्रकार गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्य जगतात बघायला मिळतोय. याविषयी काही माहिती:-

गेले १०-१२ वर्ष सोशल मिडिया, वेगवेगळी मराठी संकेतस्थळे स्वतःचा ब्लाॅग/ अनुदिनी याद्वारे अनेकांनी विविध विषयावर उत्तमोत्तम साहित्य लिहिले

यात मला दोन व्यक्तींबद्दल लिहायचे आहे ज्यांनी आपल्या लेखनाचा शेवट 'आपला' किंवा 'आपला विश्वासू ' एवढाच न ठेवता ते लिहून खाली आपले नाव लिहिण्यापूर्वी कंसात एक विशेषण जे त्यांनी त्या लेखात लिहिलय त्याला सुयोग्य असेल असे लिहून पुढे आपले नाव ,अशी पध्दत सुरु केली.

ही पध्दत इतकी आवडली की अनेकांनी ( माझ्यासकट) त्या गोष्टीचे अनुकरण करण्यास सुरवात केली. माझ्या मते मराठी साहित्यातला हा एक वेगळा प्रकार यानिमित्ताने पुढे आला आहे.

त्या दोन व्यक्तींची नावे सांगतो
१) तात्या अभ्यंकर ( मिसळपाव या संकेतस्थळाचे मालक, एका अनुदिनीचे लेखक. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत)

२) धोंडोपंत आपटे  ( जेष्ठ ज्योतिषी अभ्यासक, अनेक संकेतस्थळांवर लेखन, "धोंडोपंत उवाच" या अनुदिनीत ज्योतिष विषयक लेखन)

मंडळी या दोघांपुर्वी कुणी अशा पद्धतीने लिहिले असेल तर मला कल्पना नाही. मी पहिल्यांदा असे लेखन या दोघांच्या लेखनातूनच पाहिले.

 तात्यांनी 'मिसळपाव' संकेतस्थळावर अनेक लेखांना प्रतिक्रिया देताना याचा खुबीने उपयोग केला आहे.

( मुळ लेखापेक्षा काही काही जणांच्या त्या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया या अभ्यासपूर्ण किंवा छान असतात हे सोशल मिडीयावर फेर फटका मारताना दिसून येते. अगदी आजच्या व्हाटसप, फेसबुक जमान्यात ही केवळ यांची प्रतिक्रिया वाचायला मिळावी असे वाटायला लावणारे काहीजण आहेत. यात तात्या अभ्यंकर होतेच पण नव्याने ओळख झालेले 'मैफल' समुहातील 'ऋतुराज पत्की', कोल्हापूर यांचा ही मी समावेश करीन, याचबरोबर आमचे काही खास मित्र ही आहेतच.

आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया  लिहिणा-यांबद्दल परत केंव्हातरी)

पंतांच्या लेखनाच्या शेवटी तुम्हाला मी वर लिहलय त्या पध्दतीची  अनेक उदाहरणे दिसतील. काही मोजकी इथे देतो

पंतांचा लेखातून संग्रहित :-

( साईभक्त) धोंडोपंत
( पामर)  धोंडोपंत
(स्वामीमय) धोंडोपंत
( सूक्षमदर्शी)  धोंडोपंत
( दु:खविलासी) धोंडोपंत
( साक्षीदार) धोंडोपंत
( मार्गदर्शक ) धोंडोपंत
( व-हाडी) धोंडोपंत
( शास्त्रीबुवा)  धोंडोपंत
( अानंदित) धोंडोपंत
( ज्योतिर्विद) धोंडोपंत

ही काही मोजकी उदाहरणे ☝🏼. प्रत्येक उदाहरण त्या त्या लेखाशी संबंधित.  तात्या अभ्यंकर होते, पंत असतील, आज अनेक जण आपल्या लेखनाचा शेवट आपल्या नावाआधी एक विशेषण लावून करत आहे.  अर्थात मी ही याला अपवाद कसा ठरेन?

क.लो.अ.ही.वि.

आपलाच
( अती टुकार)  अमोल 📝
२३/०५/२०२०
poetrymazi.blogspot.in

Wednesday, May 20, 2020

सेकंड इनिंग


सेकंड इनिंग 📝

तब्बल २ महिन्यानी आज आॅफीसला गेलो. अनामिक भीती सगळीकडेच जाणवत होती. पुढे काय याचा ताण स्पष्ट दिसत होता. अनिश्चितता जाणवत होती. पण कुठून तरी सुरवात ही होणे आवश्यक वाटत होते. अजून काही दिवस एक दिवसाआड जाणे होईल, कदाचित पुढील महिन्यापासून रोज जावे लागेल. पण पुढे येणारा काळ सर्वांची कसोटी घेणारा असणार यात शंका नाही.

कसोटी वरुन आठवले, कसोटी सामन्यात दोन डाव असतात. पहिल्या डावात शतकावर शतके काढणारा दुस-या डावात यशस्वी होतोच असं नाही. हे  साधारण पाहण्यातल सांगतोय.

पण काही काही खेळाडू / कलाकार केवळ
 दुस-या डावा मुळे प्रसिद्ध झालेत.
उदा. व्हि.व्हि एस लक्ष्मण. त्याच्या अनेक खेळीत दुसरा डाव जास्त रोहमर्षक ठरलाय.
रवी शास्त्री - प्रत्यक्ष क्रिकेट मधे मर्यादित यश मिळाले असताना समालोचक म्हणून दुसरी इनिंग जास्त यशस्वी ठरली.

अमिताभ बच्चन / सुनील गावसकर सारखी वय्यक्तिमत्व ही कुठल्याही इनिंग मधे यशस्वी ठरली असे म्हणता येईल.

मला तरी सध्या एवढेच आठवले. तुम्ही यात तुमच्या पहाण्यातील व्यक्तींची भर घालू शकता

बस ! या काही लोकांचा आदर्श पुढे ठेऊन आपलीही सेकंड इनिंग सुरु करायची आहे. मनाला सध्या जे अदृश्य कुलुप लागलय ( लाॅक) ते उघडायचे आणि पुढे जात रहायचं. या टप्प्यावर ( सेकंड इनिंग) थोडा वेगळा मार्ग / वेगळी आव्हाने स्विकारावे लागणार आहेत याची मानसिक तयारी ही करायचीच   आणि मनाला सारख सांगायचय,

रुक जाना नही , तू कही हारके... ✌🏻

अमोल

Tuesday, May 19, 2020

स्वप्ने


( गोड)  स्वप्ने

मंडळी सवयीने आपण 'गुड नाईट' अॅन्ड 'स्वीट ड्रीम्स' असे अनेकदा म्हणून त्यादिवसापुरता सोशल विराम घेतो. काल अचानक एका मित्राने याला पर्यायी शब्द   ' गोड स्वप्नात तुमची रात्र शुभ जावो ' असे म्हणावयास सुचवले.  खरंच किती छान पर्यायी मराठी शब्द ना हा? नक्कीच वापरण्यासारखा

खरं म्हणजे आजकाल स्वप्न ही रेड,आॅरेज, ग्रीन झोन ची पडत आहेत. अचानक मला मुंबईहून सांगलीला जायला परवानगी मिळालीय आणि मी सहकुटुंब पुण्यात बावधनला मित्राकडे जेवणासाठी थांबा घेऊन परत सांगली कडे मार्गस्थ झालो आहे, कुठेही वाटेत अडवणूक नाही, सांगलीत ही बायपास रोडने सरळ कारखान्यावर सुखरुप पोहोचलो असे ( गोड/ ग्रीन)  स्वप्न मला आजकाल वारंवार पडत आहे. अरे, का घाबरत अाहेस? तुझ्या गाडीचा नंबर ही MH 10 ने  सुरवात होणारा आहे, उठ, नीघ, आणि वेळेवर पोच, कुणी नाही अडवणार तूला असा दृष्टांत होऊन भल्या पहाटे जाग येत आहे . पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात या आशेवर सध्या आहे.

तसा ज्योतिष मार्गदर्शन करत असल्याने ब-याच वेळा आम्हाला काल अमुक एक स्वप्न पडलेले, ते चांगले का वाईट?  अशी विचारणा वारंवार होते. परवा कोल्हापूरातून एकाचा फोन आला.  ती व्यक्ती म्हणाली काल स्वप्नात भयंकर वीज चमकलेली ⚡बघीतली. घाबरलो मी. यंदा पण परत पूर येणार का? स्वप्नाचा काय अर्थ लावायचा? असे त्यांनी विचारले.

म्हणलं काका सध्या कुठला महिना चालू आहे?  मे महिना ना?  कोल्हापूरात मे महिन्यात गडगडाट / कडकडाटासह वळवाचा पाऊस पडतो ना. उघड्यावर असलेला शेतमाल सुरक्षित ठेवा. हेच तुमच्याही मनात आह जे तुम्हाला स्वप्नात दिसले. या स्पष्टीकरणावर त्यांचे समाधान झाले. 

ही एक गोष्ट जी या स्वप्नांबाबत म्हणली जाते की " मनी वसे ते स्वप्नी दिसे " ते पटते.
 ब-याचजणांना असा अनुभव ही आहे. शात्रीय माहीती सध्या विचारात घ्यायला नको कारण लेखनाचे हे प्रयोजन नाही ( ता.क: स्वप्न पडत असतील आणि त्याचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी लेखनाच्या शेवटी दिलेल्या इमेलवर संपर्क करु शकता)

तर विषय भलताच दुसरी कडे गेला. मुळ विषय 'गोड स्वप्नांकडे ' परत येऊ. आणखी थोडा बदल करतोय गोड स्वप्नां एवजी 'स्वप्नांचा गोडवा' काय असतो आणि मराठी गाण्यात / कवितेत ही स्वप्ने मी कुठे पाहिली हे शोधण्याचा हा एक प्रयत्न

"स्वप्न" या विषयावर गाणे सांगा असे म्हणल्यावर अनेकजणांना गाणे आठवेल ते म्हणजे

गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा
*स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा*
या गाण्याचे शेवटचे कडवे मला जास्त आवडते

नैराश्य कृष्णमेघी आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजूनी, प्रीती फुलोनी यावी
काट्याविना न हाती केंव्हा गुलाब यावा
*स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा*
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा

चला स्वप्नाच्या वाटेवर थोडा अजून फेरफटका मारु या
'स्वप्न' कशी असावीत याचे छान वर्णन या गाण्यात आहे बघा

कट्यार चिमणी कटिला साजे, जिरेटोप तो सान विराजे
लुटुलुटु येता हे *शिवराजे*, शिवनेरी वर वत्सलतेचे
निशाण भगवे फडफडते!  🚩

चित्तोडगडचा शूर इमानी, प्रताप राणा बाल होऊनी
मिठी मारता दोन्ही करांनी,अभिमानाचे पंख लावुनी
काळीज माझे नभी उडते!
*स्वप्न उद्याचे आज पडते*
*चित्र चिमणे* *गोजीरवाणे,नयनापुढती दुडदुडते*

एका आईने स्वप्नात आपल्या बाळाला असे पाहिले ☝🏼

पुढचचे गाणे हे स्वप्नातल्या राजकुमारासाठी असले तरी तो राजकुमार प्रत्यक्ष श्रावण महिना असावा असं मला राहून राहून वाटत, बघा

सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती
वैराणावर उधळीत आला,श्रावण सुंदर मोती
मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा
*स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या,राजस राजकुमारा*

हे ही एक छान गाणे  स्वप्नावरच

स्वप्नात पाहिले जे ते रुप हेच होते
हे स्वप्न मी म्हणावे की स्वप्न तेच होते

तो रंग केवड्याचा,ते ओठ अमृताचे
त्या यौवनात होते प्रतिबिंब चांदण्याचे
तारे नभात होते,नयनात दीप होते
*स्वप्नात पाहिले जे ते रुप हेच होते*

खरंच एकदा निद्रादेवीच्या अधीन झाल्यावर ही स्वप्ने तुम्हाला कधी भेटायला येतील हे सांगता येत नाही. पण काहीजणांना स्वप्ने बघायचा ही छंद लागतो मग त्यांची अवस्था या गाण्यासारखी होते:-

'स्वप्नात रंगले मी,चित्रात दंगले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी'

मंडळी कंटाळलात ना वाचून? हं
काही इतर गाण्याचा फक्त उल्लेख करतो
१)
स्वप्ने मनातली का वा-यावरी विरावी
का प्रितीच्याच दैवी ताटातुटी असावी
२) स्वप्नावरी स्वप्न पडे
३) स्वप्नांजरी ते भेटून गेले

जगदीश खेबुडकरांच्या या गाण्याने 'स्वप्न पुराण' आवरते घेतो.

मी जीवन गाणे गावे, तू स्वरात चींब भिजावे
दोघांनी हरवून जावे, ही किमया नकळत करशील का? ....

पुढच्या ओळी. ...🤔

बघा आज रात्री  स्वप्नात येतात का त्या?  आल्या तर या लेखाचे सार्थक झाले असे म्हणेन 😊

आणि हो आज रात्री सगळ्यांना

' गोड स्वप्नात तुमची रात्र शुभ जावो '  अशा शुभेच्छा द्यायला विसरू नका ☺


📝अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com
१९/०५/२०२०

Monday, May 18, 2020

आमचे 'बुद्धी चे बळ'


शालेज जीवनातील 'मे' महिन्याची सुट्टी फार महत्वाची असते. अनेकजण सहमत होतील. पाठ्यपुस्तका बाहेरील शिक्षण / अवांतर शिक्षण घेण्याची, एखादा छंद/ कला, एखादी नवीन गोष्ट शिकण्याची ती नामी संधी असायची.  आमच्या लहानपणी 'व्यक्तीमत्व विकास शिबीरे' काही ठिकाणी सुरु झाली होती. काहीजण स्वतंत्रपणे पोहणे, निवासी शिबीर, अनिवासी शिबीर ( इथे अनेकांना 'स्वामी' सर आठवत असतील ) , गाण्याचा क्लास, क्रिकेट कोचिंग,  तबला/ पेटी क्लास,  मल्लखांब, योगासन वर्ग इत्यादी अनेक गोष्टी करत. यातील ब-यापैकी गोष्टी मी ही केल्यात. साधारण महिन्याभरातील सुट्टीत १५ दिवस पुणे-मुंबई फिरणे आणि १५ दिवस हे सगळे असे अंदाजे गणीत असायचे.
याचसुमारास काही स्पर्धा सांगली परिसरात व्हायच्या. यात लक्षात राहण्यासारखी स्पर्धा होती ती 'नूतन बुध्दीबळ' संस्थे तर्फे घेतली जाणारी स्पर्धा. ३-४ वर्षे या स्पर्धेत अगदी उत्साहाने भाग घेतला ( त्या आधी फक्त शाळेतल्या बुध्दीबळ स्पर्धेतील विजयाचा अनुभव होता .वासरात लंगडी गाय शहाणी असेच जणू).

स्पर्धेचा खरा कस इथे लागला. संपूर्ण देशातून आलेले खेळाडू,  अनेक अनुभवी स्पर्धक , बाजूला घड्याळ ठेवून ,डाव कागदावर लिहिण्याचे कसब, टच टू मूव्ह चा नियम, धांदरटपणाने आपली खेळी करुन झाल्यावर घड्याळाचे बटण न दाबता आधी बटण दाबून मग खेळी केल्यावर पडसलगीकर सरांच्या खालेल्या शिव्या. मजा तेंव्हा यायची जेंव्हा दोन-चार फे-यात अमुक खेळाडू आघाडीवर असं लोकल पेपरात कुठेतरी अगदी लहान नाव यायच तेंव्हा. आज रविवारच्या पुरवणीत मोठाले लेख नावासकट आले तरी त्यावेळी पेपरात नाव आलेल्याचे मोल हे केवळ अमोल होते. ती मजा आता नाही.

पेपरात नाव यायला सुरवात झाली की तिकडे स्पर्धेत हळूहळू आमची घसरगुंडी व्हायला एकच गाठ पडायची कारण चार -पाच फे-या नंतर जे खरोखरच उत्तम खेळाडू होते त्यांच्याशी खेळावे लागायचे आणि तिथे काही डाळ शिजायची नाही.

नूतन बुध्दीबळ स्पर्धेत विजयी कधीच झालो नाही पण काही उत्तम खेळाडूञ बरोबर खेळायला मिळाले. एक दोन लढती प्रतिष्ठित खेळाडूंबरोबर बरोबरीने सोडवल्या. एक लढत तर स्वतः पडसलगीकर सरांनी तिथे थांबून पाहिली आणि बरोबरीत सोडवल्यावर नाराज झाले. कारण ती लढत मी सहज जिंकू शकलो असतो असं त्यांनी नंतर परत डाव मांडून दाखवले.

बुध्दीबळाचे पितामह पडसलगीकर सरांचे हे आयुष्यभरासाठी मिळालेले  आशीर्वाद आहेत असे मी समजतो. कारण त्यांच्याकडे शिकायला वगैरे कधी जात नव्हतो. बुध्दिबळ हा फक्त छंद म्हणून पहायचो तेंव्हा.
पडसलगीकरां सारखेच बुध्दीबळातले एक चाणक्य म्हणजे 'म्हैसकर' सर होते. मला एकदा आठवतय आमच्या शाळेत ते एकदा एकावेळी १५-२० जणांबरोबर खेळले होते. त्यावेळी सगळ्यात शेवटी मी उरलो होतो. आणि त्यांच्याशी खेळलेला डाव बरोबरीत सोडवला होता. बुध्दीबळाचा हा छंद पुढे अगदी काॅलेजला ( ११-१२ वी)  असताना ही विजयी करुन गेला.

आता या लेखाचा शेवट या खेळातील एका छोट्याशा तत्वज्ञानाने. अनेक जणांनी हा खेळ खेळला असेल, खेळत असतील. अनेक सोंगट्या,  त्यांचा मार्ग, चेक, कॅसलीन, डाव सुरु करण्याच्या पध्दतीही अवगत असतील. केवळ पटावरच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही आपण अनेक खेळी  दुस-याला पेचात पकडण्यासाठी करत असतो. समोरुन आलेल्या चालींवर आपली खेळी करतो ( राजकारणी तर यात भलतेच हुषार. पण सध्या तो मुद्दा नको)

अगदी पटाप्रमाणे घमासान युध्द करतो, अनेक मोहरे ( मुद्दे?) धारातीर्थी पडतात. स्वत:च्या राजाला वाचवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मोहरा 'वझीर' ही कामी येतो. कधी दोघांना एकमेकांचे वझीर मारावे लागतात अशावेळी

पटावर उरलेले, जे फक्त सुरवातीलाच  दोन घर ओलाडता येणारे आणि नंतर फक्त एक एक घर पुढे जाणारे  खेळातील सगळ्यात हलके समजले जाणारे 'प्यादं' हे जर प्रतिस्पर्धीच्या बाजूच्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचले तर परत 'वझीर ' बनू शकते. ही किमया फक्त 'प्यादं ' करु शकते बाकी कुणी नाही

संतांनी ही सांगून ठेवलयं

महापूरे झाडे जाती, तिथं लव्हाळी वाचती 🌿🙏🏻

📝अमोल
१८/०५/२०२०

Sunday, May 17, 2020

माझा पहिला राजधानी प्रवास


आज १७ मे. मुंबई - दिल्ली राजधानीचा वाढदिवस. आज ती ४८ वर्षाची झाली. या संबंधित एक छान लेख आमचे जेष्ठ मित्र रामभाऊ यांनी फेसबुकवर लिहिलाय त्याची ही लिंक 👇🏻
इच्छूकानी अवश्य वाचावा

https://www.facebook.com/625832933/posts/10157432594367934/

यानिमित्याने आमचा पहिला राजधानीचा प्रवास आठवला. खरं म्हणजे सांगलीत राहणाऱ्या आमच्यासाठी 'महालक्ष्मी एक्सप्रेस' हीच राजधानी असायची. पण मुंबईत सुट्टीला गेलो की प्रत्यक्षातली राजधानी अधूनमधून दिसायची. मालाडला माझी आत्या होती त्यामुळे तिच्याकडे ब-याचदा रहायला जायचो. प्रत्येक सिझनला एकदा तरी ही दर्शन द्यायचीच. सर्व डबे वातानुकूलित,  इंजीनाची रंगसंगती ही डब्यासारखीच आणी इतर गाड्यांपेक्षा-( जणू खळ खट्याक) वेगाने जाणारी म्हणून हीचे कौतुक वाटायचे. आपल्या नशिबात या गाडीत बसणे आहे की नाही असे मनात येऊन जायचे.
सुदैवाने मुंबईतच नोकरीला लागल्यावर ही संधी मिळाली. साधारण २००३ साली. मात्र हा प्रवास संपूर्ण नव्हता म्हणजे मुंबई -दिल्ली किंवा दिल्ली - मुंबई ही नव्हता. तर 'कोटा' ते मुंबई असा उलटा प्रवास केला. कोट्याला दिल्लीहून निघालेली राजधानी रात्री ९:३० च्या सुमारास यायची नंतर फक्त पहाटे बडोदा स्टाॅप आणि नंतर थेट ८-८:३० पर्यत मुंबई सेंट्रल. आता सध्या राजधानीला अनेक थांबे दिलेत मात्र त्यावेळी फक्त एवढेच असायचे.
तर कोटा शहरापासून ५-६ तास लांब असणाऱ्या श्री  गंगानगर जिल्ह्यातील एका पाॅवर प्लॅनट्चे टेंडर सबमीट करण्यासाठी सकाळी लवकर हाॅटेल सोडले. आज आयुष्यातील पहिला राजधानीचा प्रवास करायला मिळणार त्यासाठी वेळेवर परत यायचे हेच डोक्यात होते. कोटा हे मधले स्टेशन होते आणि राजधानी साठी आरक्षण  'कोटा' ही फक्त ३-४ माणसांचा होता. त्यात माझे तिकीट वेटींग १ का २ होते.  तिकीट कन्फर्म होणार की नाही याची धाकधूक होतीच. आधी येऊन गेलेल्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ने दिलेल्या सल्ल्यानुसार तिकीट + काही पैसे हाॅटेल मालकाला दिले. त्याने तिकीट 'कन्फर्म हो गा, चिंता मत करो ' असे शाश्वत केले.

ठरल्याप्रमाणे प्रवास, मिटींग, कामे , आणि टेंडर सब्मीशन करुन परतीच्या प्रवासास लागलो. तिकीट कन्फर्म झाले की नाही हे हाॅटेल मधे पोहोचल्यावरच कळणार होते. मोबाईल नसण्याचे रम्य दिवस होते ते. परतीची बस पॅसेंजर बसच होती. मजल दलमजल करत अंतर कापत होती.  रात्री साधारण ८ च्या सुमारास ' कोटा ' पासून ३०-४० किमी अंतरावर एका घाटात बसला अचानक अपघात झाला. सुदैवाने ड्रायव्हर ने बस घाटातील डोंगरावर धडकवली ( म्हणून आज तुम्ही हा लेख वाचत तरी आहात). समोरच्या सिटवर दण्णदिशी आदळलो.हनवटीला लागलेलं कळलं. बसमधले लाईट गेले .पुढेच असल्याने बसमधून उतरणाऱ्या पहिल्या चार पाच प्रवाश्यांच्यात मी होतो.

दैव बलवत्तर म्हणायला पाहिजे की अपघात फार मोठा नव्हता. ड्रायव्हरचा दिवसभर उपवास झाल्याने त्याला चक्कर वगैरे आली म्हणून अपघात झाला असे ऐकले. सुदैवाने मागून आलेल्या एका कारवाल्याने माझ्यासकट आणखी एक दोघांना कोटा शहरापर्यंत लिफ्ट दिली.

हाॅटेल मालकाने तिकीट कन्फर्म झाल्याचे सांगितले , कोच बर्थ फलाटावर जाऊन तिथे आरक्षण चार्टवर बघायला सांगितले आणि आमचा राजधानीच्या पहिल्या प्रवासाचा मार्ग सुकर झाला.

फलाटावर गेल्यावर कोच, सिट नंबर कळला. साईड अप्पर माझ्यासाठी पुरेसा होता. १५-२० मिनिटे गाडी उशीरा आली. जागेवर म्हणजे साईड अप्पर वर जाऊन बसलो  कारण खालची व्यक्ती झोपल्याने थोडावेळ बसून प्रवासाची मजा घ्यायची इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही.
कोच असिस्टंट ने जेवण, फ्रुटी का काय दिले. याक्षणी भूकेची जाणीव झाली. मस्त पॅकिंग असलेले ते जेवण ब-यापैकी धांदरटपणा करुन उघडले. पहिला घास घ्यायला तोंड उघणार तोच...

तोच काय. आत्ता कुठं ध्यानात आलं ,जबडा त्या अपघाताने सुजला होता आणि 'आ' करायचे नाव घेत नव्हता. परोठा चावून खायचा असल्याने ते शक्य झाले नाही. भाताची  चार शिते कशीबशी डाळीत भिजवून खाल्ली. स्टाॅचा जबड्याशी संबंध न आणता फ्रुटी पिऊन निद्रादेवीच्या आधीन झालो.

मात्र यानंतरच्या अनेक राजधानी चे प्रवास प्रत्येकवेळी या पहिल्या प्रवासाची आठवण काढत अगदी मस्तच संपन्न् झाले.

( 🚊प्रेमी ) अमोल
१७/०५/२०२०

Wednesday, May 13, 2020

या भवनातील गीत .


*१३/५/२०२०*
(या भवनातील गीत ....🏡 )


मंडळी, प्रत्येक वर्षी येणा-या काही तारखा या आपल्यासाठी विशेष असतातच जसे आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, मुलांचे वाढदिवस आणि अशाच काही  इतर तारखा . यंदाच्या २०२० वर्षातील  १३ मे या तारखेची मात्र मी अगदी आतुरतेने वाट पाहत होतो जी अर्थातच आज आहे.

नाही नाही ' दिन विशेष ' वगैरे पाहू नका त्यात काही मिळणार नाही
पण १३/५/२०२० शी आमचे ( केळकर परिवार , माधवनगर ) इतके ऋणानुबंध होते की ही आमच्या सर्वाचीच ' मर्मबंधातील ठेव आहे'

साधारण १९३०/१९४० - ते १९९०  अशी किमान ५० - ६०  वर्ष आमच्या केळकर कुटूबियांचा पत्ता असा होता

*१३५ गुरुवार पेठ , माधवनगर ( जिल्हा सांगली ),फोन नंबर २०२०* सांगली जिल्ह्याची जी काही फोन डिरेक्टरी निघायची त्यात काकांच्या नावासमोर असे लिहिलेले असायचे ☎

माधवनगर कॉटन मिलचे मॅनेजर श्री गंगाधर नारायण केळकर म्हणजे माझे सख्खे काका अर्थात आम्ही सगळे त्यांना दादा म्हणायचो.



त्यांना  काॅटन मिल मध्ये लागल्यावर  रहायला मिळालेली जागा म्हणजे १३५ गुरुवार पेठ .
आजच्या भाषेत कंपनी काॅर्टर्स.

या घराबद्दल तर जेवढं लिहावं तेवढं थोडंच आहे.  ही जागा  म्हणजे प्रशस्त कौलारू बंगला प्रशस्त खोल्या, मुंबईतील साधारण १का मोठ्या खोलीएवढे फक्त देवघर, प्रशस्त माडी. अंगण, माजघर,पडवी, मागच्या बाजूला विहीर, पुढच्या बाजूला हौद, तुळशी कट्टा, पेरु, सिताफळ यांची भोवताली झाडी, घराच्या वरती लिहिलेले ॐ आणि प्रवेशद्वारा जवळ असलेले
पांढ-या चाफ्याचे झाड.🌱

असे हे घर माझ्यासाठी 'नंदनवन' ठरले नसते तर नवल. ' घर असावे घरा सारखे नकोत नुसत्या भिंती' हे काव्य इथे अनुभवले. केळकरांचा मोठ्ठा परिवार, एकत्र कुटुंब, वेगवेगळ्या कामानिमित्त सतत येणारे नातेवाईक - परिचीत, यामुळे  अर्थातच केळकर परिवारासाठी हे गोकुळच होते.  सर्वांचे आदरातिथ्य करणारी काकू,काका आणि वयाने मोठे असणारे माझे चुलत बहिण भाऊ
यांच्यासह 'बालपणीचा काळ सुखाचा' हे शब्दश: अनुभवलं कारण घरातील शेंडेफळ मीच होतो.
संध्याकाळी दिवे लागणीला काका सर्व स्तोत्रे म्हणून घ्यायचे. स्वतः ते अनेक वर्ष आसनं करायचे. आम्हाला करायला लावायचे. दर महिन्याला पोर्णीमेच्या आदल्या दिवशी पंपंम गाडीतून 🚗 न चुकता नरसोबावाडीला जायला मिळायचे. वयाच्या १-२ वर्षापासून ते काका निवृत्त होईपर्यंत / मी सांगलीत असे पर्यत न चुकता वाडीला गेलो आहे.
 त्यावेळी गाडीतून जायची जी मजा होती ती आता स्वतः ची गाडी असताना ही नाही. त्यावेळी फिरायला जाणे एवढच ध्येय होते तरी धार्मिक तेचे बीज माझ्यात नकळत काका- काकूं मुळे रुजले गेले यात शंकाच नाही.
उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहणे, दिवाळीत किल्ला बनवायला मोठ्या भावाने शिकवले. संघ शाखेचा जो काही अनुभव मिळाला तो ही याच घरा जवळ असणाऱ्या आरोग्य केंद्रातून.

थोडक्यात अनेक संस्कारांचे 'बाळकडू' या वास्तूत मिळाले. देव दिवाळी ( देवांचे विमान यायची वाट बघणे हा मजेशीर कार्यक्रम) , ललिता पंचमी, बोडण, सत्यनारायण, हदगा, मंगळागौर, हळदी-कुंकू, डोहाळजेवण, बारसं, केळवणं, लग्न- कार्यानिमित्यचे ग्रहमक, पूजा असे सर्व सोहळे एन्जॉय केले. लहानपणी हे बायकांचे कार्यक्रम हे पुरुषांचे असा भेदभाव कधीच मानला नाही.

आमचा चुलत भाऊ ( माधव भाऊ) याच्या लग्नाला पुण्याला जाण्यासाठी केलेली 'प्रासंगिक करार' लालपरी जेंव्हा १३५ गुरुवार पेठ माधवनगर समोर उभी राहिली होती तेंव्हा काय आनंद झालेला सांगू
अमर्याद आठवणी आहेत. थोडक्यात लिहायचा प्रयत्न केलाय.

  १३५ बद्दल झालं आता थोडं २०२० बद्दल

 काका कंपनीचे मॅनेजर असल्याने त्यावेळची सहजासहजी न आढळणारी गोष्ट म्हणजे  लँडलाईन फोन घरी होता.जुन्या  लँडलाईन ची मजा / अनुभव अनेकानी  घेतला असेलच यात शंका नाही . ७/८/९/० नंबर फोन लावताना आले तर लागणारा वेळ, फोनची टिपिकल रिंग, शेजा-यांना फोन आला तर बोलवायला जाणे, ट्रंक काॅल बुक करणे, फोन डेड झाल्यावर करावे लागणारे उपद्व्याप अनेक गोष्टी आहेत.

या वास्तूत घडलेल्या अनेक चांगल्या गोष्टी/ नियतीने समोर ठेवलेल्या ब-या वाईट घटनांना हा फोन साक्षी होता.

अशी ही १३/५/२०२० ची छोटी गोष्ट

केळकर परिवारासाठी अभिमानास्पद. या देव घरातील 'देव' माणूस म्हणजे आमचे काका आॅक्टो १९ मधे वार्धक्याने 'देवा'घरी गेले ते आम्हाला समृद्ध करुन

हा लेख त्यांना समर्पित 🙏🏻

त्यांचे संस्कार,आठवणी आणि नातू शेठनी दिलेली आणि अनेक वर्ष या घरात विराजमान असलेली श्री गुरुदेव दत्ताची मूर्ती कायम सोबत राहील.

अमोल केळकर 📝

#मर्म_बंधातली_ठेव_ही
#१३५ गुरुवार पेठ माधवनगर
#फोन नं २०२०

Sunday, May 10, 2020

चार्जींग उरता उरेना.


मुळ गाणे आणि विडंबन दोन्हींची मजा घ्या

वाट संपता संपेना
कुणी वाटेत भेटेना
कुठे आलो असा कसा
कुणी काहीच सांगेना

[ चार्जींग उरता उरेना
कुणी चार्जर देईना
संपून गेलं असं कसं
हे काहीच समजेना ]

लांब लांब उंच घाट
वाट वाकडीतोकडी
दूर दूर अंधारात
एक दिसते झोपडी
सूर येती अंधारती
कुणी गीतही म्हणेना

[ लांब तिथे कोनाड्यात
वायर खुपच तोकडी
दूर त्या साॅकेटपाशी
 माझी नजर  वाकडी
पोरं येती लावून जाती
कुणी घ्याहो म्हणेना ]

दिसे प्रकाश अंधुक
नभी ता-यांचा कंदील
अंतर दोन मैलांचे
आता गाठीन मंझिल
आकाशात रात्र फुले
चंद्र काहीच ऐकेना

[ होई बॅटरी अंधुक
नसे टाॅवरचा कंदील
अंतर तेही वाढलेले
कशी गाठावी मंझील
पाॅवर बॅक त्यात मिळे
मी कुणाचे ऐकेना ]

वाट संपता संपेना
कुणी वाटेत भेटेना
कुठे आलो असा कसा
कुणी काहीच सांगेना

[ चार्जींग उरता उरेना
कुणी चार्जर देईना
संपून गेलं असं कसं
हे काहीच समजेना ]

📝अमोल
११/०५/२०२०

रविवारची संकष्टी


रविवारची संकष्टी

मंडळी, मोरया 🙏🏻🌺

आज संकष्टी आहे. आध्यात्मिक दृष्ट्या खरं म्हणजे मंगळवारी येणारी संकष्टी म्हणजेच अंगारकी संकष्टी ही महत्वाची असते. असे म्हणतात २१ साधारण संकष्टी केल्याच पुण्य एक 'अंगारकी' केल्याने मिळते. असेल ही पण शास्त्रात जे लिहिलेले नाही पण माझ्या अनुभवाने सांगतो की उपास करणा-याची खरी परीक्षा
'रविवारची संकष्टी'  घेते हे नक्की.

एकाग्रतेने  तपश्चर्येत मग्न असणा-या तपस्वीचे मनोबल घालवण्यासाठी येणा-या अप्सरेप्रमाणे अनेक प्रलोभने येतात. यात जो निभावून जाईल तोच खरा योगी.

साबुदाणा भिजवला आहेस ना गं!  अशी प्रेमळ आठवण बायकोला करुन झोपण्यापूर्वी बॅक आॅफ द माईंड उद्या संकष्टी आहे अशी मनाच्या खोल कोपऱ्यात नोंद ठेवली तरी सकाळी ८ वाजता रंगोली बघताना( ऐकताना), हातात रविवारची पुरवणी चाळताना, समोर चहाचा कप आणि हात चूकून बिस्किटाच्या डब्याकडे जाऊ न देणे म्हणजे तेज गोलंदाजीच्या पहिल्या १० ओव्हरीत खेळपट्टी वर नुसते टिकून राहण्या सारखे अवघड काम.
मुले संकष्टीच्या उपवासात नसल्याने रविवार सकाळची मुलांसाठी बनली जाणारी ' मॅगी ' अगदी २ मिनिटात तुमची विकेट घेऊ शकते.  हा एक क्षण पार पाडला की मग दुपारी फराळ झाल्यावर 'बडीशेप' रुपी गुगली तुम्हाला त्रिफळाचित करु शकते.

हे तीन महत्वाचे स्पेल संपल्यावर रविवारचा आराम करुन संध्याकाळी गणपतीला जाऊन रविवारच्या एका दिवशी च्या घरगुती  खरेदीसाठी  बाहेर पडलात की अगदी फुटपाथवरील पाणी पुरी किंवा नेहमीच्या ठिकाणची भेळ, शेव बटाटा पुरी,  वडापाव,  सामोसा याचा सुगंध 'रविवारच्या संकष्टी ' दिवशीच आसमंतात जरा जास्तच का भरलेला असतो? हे कोडं मला अजून सुटलेले नाही.

इथेही तुमची विकेट शाबूत राहणे महत्वाचे.

बाकी रविवार असल्याने नेहमीच्या गडबडीत पूजा न करणे, २१ आवर्तन,  आणि रात्री  उकडीचे मोदक ही 'रविवारच्या संकष्टीची दुसरीही बाजू,  जास्त हवीहवीशी वाटणारी

मोरया 🙏🏻🌺 📝

अमोल
१०/५/२०२०
देवा तुझ्या द्वारी आलो
kelkaramol.blogspot.in

Friday, May 8, 2020

झूमेरिया हूवा


तिन्ही त्रिकाळ 'झूम' वर पडिक असणाऱ्या ( आमच्या सारख्या)
  ' वर्क फ्राॅम होम ' कर्मचाऱ्यांना समर्पित

क्या हूवाँ ! इसे क्या हूवाँ!
दोस्तो इसे क्या हूवाँ
इसका तो बज गया बाजा

सर्दी खासी ना मलेरिया हुवा
ये गया यारो उसको
क.. क.. क क... करोनिया 😷

नाही बाबा

झू झू झू
"झूमे"रिया हूवा, झूमेरिया हुवा 🧐

मिटींग आयडी जो लेके
 पासवर्ड मेरा खो गया
 लाॅगिन नाही अब तो मुमकिन
 है जाने क्या मुझको हो गया
 राहू खोया खोया, जगू सोया सोया -
 काम करती दावा ना दुआ

झू झू झू
"झूमे"रिया हूवा, झूमेरिया हुवा 🤓

नेटवर्क से परेशान सारे
 आवाज हमको  ही मारे
 ???? नाही देखो फिर भी भी ???
 है कैसी है तू बीमारी
 डर जाता नाही, प्रोग्रेस होती नाही -2
 काम कराती ना दुआ

सर्दी खासी ना मलेरिया हुवा
ये गया यारो उसको
झू झू झू
"झूमे"रिया हूवा, झूमेरिया हुवा 🧐


📝 अमोल

https://youtu.be/aPD6fj2YD6A

Monday, May 4, 2020

तूला पाहतो ग


करोनाला न जुमानता सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवणा-या, चांदा पासून बांद्या पर्यंतच्या सर्व तळीरामांना( योध्दयांना 🏇🏻 ) समर्पित 🥴
🍺🍷🥃🍸🥂🍻


( मुळ गाणे: तुला पाहते रे तुला पाहते, जरी आंधळी मी तुला पहाते)

तुला पाहतो ग तुला पाहतो
तुझी चव माझ्या गळी ठेवतो
तुला पाहतो ग तुला पाहतो
तुझ्यासाठी रांगेत उभा राहतो

तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे
तुझ्या मिळण्याने मनी प्रित जागे
तुझ्या दर्शनाने सुखी होवतो

तुला पाहतो ग तुला पाहतो
तुझ्यासाठी रांगेत उभा राहतो


किती भाग्य हे 'लाॅक डाऊन' असुनही
दिसे ग्लास झोपेत जागेपणीही
'चणे चकण्याचे' आता मागतो

तुला पाहतो ग तुला पाहतो
तुझ्यासाठी रांगेत उभा राहतो

कधी 'भक्त' का पाहतो ईश्वराला
नदी न्याहाळी का कधी सागराला
त्यांचा सारखा मी सदा वागतो

तुला पाहतो ग तुला पाहतो
तुझ्यासाठी रांगेत उभा राहतो

📝अमोल केळकर
०४/०५/२०२०
poetrymazi.blogspot.in

Sunday, May 3, 2020

पत्रिका महात्म्य


📝 "जन्म पत्रिका "

मंडळी नमस्कार 🙏🏻

एक वेगळा विषय मांडतोय. म्हणजे ज्यांचा ज्योतिष विषयात अभ्यास आहे त्यांना तर कळेलच पण ज्यांना आपली फक्त 'जन्म पत्रिका' असते आणि त्यात शनी, मंगळ वगैरे ग्रह असतात या शिवाय फारशी माहिती नाही त्यांनाही समजेल, वाचताना मजा येईल

एक गोष्ट , सदर लेखनात भविष्य पत्रिकेवरुन सांगता येते का? कितपत खरं असते? भविष्य बरोबर यायची वारंवारता काय असते? ही श्रध्दा का अंधश्रध्दा ? यावर काहीही वाच्यता केलेली नाही. त्या कडे कसे बघायचे हा प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असू शकतो. इथे फक्त 'जन्म पत्रिका ' बघून सुचलेले विचार मांडले आहेत

तर पत्रिका म्हणजे चौकोन / आयताचे केलेले १२ भाग, प्रत्येक भागात क्रमाने लिहिलेले नंबर ( घड्याळ्याच्या काट्याचा फिरण्याच्या उलट्या मार्गाने / Anti clockwise लिहिलेले ) आणि त्यात मांडलेले १२ ग्रह इतपत आपणास माहित आहेच. आता नुसती समोर पत्रिका आली की काही साधी गणित  ( आकडेमोड) करुन आपण जन्म वेळ, महिना, दिनांक, साधारण तिथी आणि हाती पंचांग असेल तर अचूक वर्ष ( हे थोडं अवघड आहे मनात करायला)  काढू शकतो.

उदा. यासाठी पत्रिकेत रवि कुठल्या स्थानात / भावात आहे हे बघायचे. पत्रिकेत रवि प्रथम स्थानात ( इथे दिलेल्या पत्रिकेत सगळ्यात वरच्या भागात जिथे 'दिगंबरा,दिगंबरा लिहिले आहे)  असेल तर जन्म सुर्योदयाचा. दशम स्थानात ( मंत्र 'श्री गजानन जय गजानन जय जय गणेश मोरया जिथे आहे ते स्थान) रवि असेल तर दुपारी १२ च्या सुमारास जन्म.  चतुर्थ स्थानात ( मंत्र ॐ गं गणपतये नम: लिहिलय ते स्थान) रवि असेल तर रात्री १२ च्या सुमारास जन्म.

यानुसार प्रत्येक भावातील 'रवि' ग्रह आपल्याला 'जन्म वेळेचा' अंदाज देतो.

आता रवि ग्रहावरुनच आपला जन्म महिना कसा काढायचा ते बघू
उदा. पत्रिकेत तुमचा रवि  ग्रह दशम भागात ( दुपारी १२ चा जन्म) असेल आणि तिथे ' ७ ' अंक ( तुळ रास त्या भागात किंवा तुळेचा रवि असेल)  लिहिला असेल तर ७ मधे ३ मिळवायचे म्हणजे उत्तर येते १० म्हणजे आॅक्टोबर महिना. थोडक्यात तुळ राशीत रवि १५ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबर असतो. तर या कालावधीतच तुमचा जन्म झाला आहे. आणखी एक उदाहरण
प्रथम स्थानात ( सुर्योदयाचा जन्म) १० आकडा असेल ( मकरेचा रवी)  तर १०+३=१३ महिने १२ असतात त्यामुळे १२+१ म्हणजे जानेवारी महिना. तर इथे जन्म १५ जाने ते १५ फेब्रुवारी मधला असणार

आता चंद्र जिथे आहे पत्रिकेत आहे ती तुमची रास
११ लिहिलय ती कुंभ
६ लिहलय ती कन्या

आपण काढलेल्या महिन्यात चंद्राची ही परिस्थिती एकदाच( २-३ दिवस)  असते. म्हणजेच आपल्या अचूक जन्मतारखेच्या २-३ दिवस मागे पुढे आपण पोहोचलो ते ही हातात फक्त पत्रिका घेऊन.
आता चंद्र- रवि यांच्यातील अंतर तिथीची जाणीव करुन देते.
दोघे एकत्र - अमावस्या
चंद्र रवि पासून anticlockwise जस जसा पुढे जाईल तसतस शुक्ल पक्षाच्या तिथी. दोन ग्रह समोरा समोर आले की पोर्णीमा आणि चंद्र परत रवि कडे जायला लागला की कृष्ण पक्ष. एकत्र अाले की परत अमावस्या

पत्रिकेत शनी एका राशीत २.५ वर्षे असतो. त्यावरुन तसेच मग मंगळ, गुरु, बुध, शुक्र ग्रहांच्या स्थिती नुसार ( जुनी पंचांग किंवा  संगणक प्रणालीच्या मदतीने ) तुम्ही अचुक जन्म वर्षे ओळखू शकता.
आहे ना सोप?  😉

( उद्या कुणी पत्रिका देऊन सांगितले ओळख कुणाची पत्रिका आहे तर अचूक तारीख काढायची आणि गुगल मधून त्या दिवशी जन्मलेली प्रसिद्ध व्यक्ती हुडकायची. आपली परीक्षा बघणारा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाची पत्रिका ओळखायला थोडीच देणार आहे 😜)

 चला अभ्यास संपला. आता थोडी गंमत जंमत करु या. लहानपणी किंवा सध्या लाॅकडाऊन मुळे पुन्हा परतलेल्या लहानपणात आपण अनेक खेळ खेळले आहोत/ खेळले आहोत . बुध्दीबळ, सापशिडी,  कॅरम, पत्याचे विविध डाव, ल्यूडो, क्रिकेट इ इ इ.
साधारणपणे  एप्रिल/मे महिन्यात खेळण्यात येणारा आयपील खेळ यंदा होऊ शकलेला नाही. पण हा कन्सेप्ट लक्षात घ्या. वेवगेगळ्या टीमचे मालक १०-१२ खेळाडू घेऊन खेळतात. कधी एखादा सामना जिंकतात कधी हरतात. खेळ चालूच राहतो.

पत्रिका ही खेळाची जागा, पत्रिकेतील ग्रह म्हणजे खेळाडू आणि तुम्ही मालक. या पत्रिकेतील  सर्व ग्रह तुमच्यासाठी वर उल्लेख केलेले विविध खेळ, विविध प्रकारे, विविध वेळेला खेळत असतात आणि मग तुम्हाला विविध अनुभव येत असतात. तुम्ही एखाद्या वेळेला जिंकता, कधी हरता.
प्रत्येकाचा पट वेगळा, पडलेले फासे वेगळे. अगदी एकाच दिवशी आयपीएल चे दोन खेळवलेले सामने जसा  वेगळा अनुभव/ निकाल देतात तस जुळ्यांचे आयुष्य ही  वेगळे घडते.

पत्रिकेतील ग्रहांमधील युती, प्रतियोग, नवमंचम, लाभ हे योग म्हणजे पत्रिकेच्या कप्तान ( महादशा स्वामी), उपकप्तान ( राशी स्वामी) यांनी लावलेली फिल्डींग. अनेकदा जाळ्यात अडकवतात, कधी मिस फिल्ड होऊन चौकार देतात. कधी सर्व क्षेत्ररक्षकांना विकेट कीपर पासून पुढे सरळ स्लिप मधे लावून तुमचा काल-सर्प योग करतात.

तर कधीकधी अंतर्दशा स्वामी, विदशा स्वामी दोन ओपनर बॅटस्मन अनुकूल परिस्थितीत चौकार षटकारांची आतषबाजी करतात.
सुनील गावसकर यांनी एका गाण्यात जे म्हणले आहे ' हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला' हे यासंदर्भात ही पटते.

मंडळी, असे हे ' पत्रिका महात्म्य ' आपणास आवडले असेल अशी आशा करतो.

आता जोतिषाचा अभ्यास करणा-यांसाठी थोडे:-  समोर येणारी पत्रिका म्हणजे एक देऊळच आहे. आपण देवळात जातो, देवाला नमस्कार करतो आणि प्रदक्षिणा मारतो तसेच समोर आलेल्या पत्रिकेच्या प्रत्येक भावातून जेवढ्या प्रदक्षिणा कराल तेवढी पत्रिका सुटायला मदत होते. इथे कधीकधी यातील ग्रहच तुम्हाला संकेत देतात, लक्ष वेधतात आणि उत्तर सुचवतात.

आणखी एक :- १२ भागात तुमचे १२ इष्ट देवतेला ठेवायचे, त्यांचा मंत्र लिहायचा ( जे मी इथे दिलेल्या पत्रिकेत केलं आहे)  बघा पत्रिका सोडवताना काही मदत होते का. आणि हो महत्वाचे म्हणजे आपापल्या क्षेत्रात सचिन तेंडूलकर बनण्याची इच्छा असतेच प्रत्येकाची पण नाही जमलं तर निदान रमाकांत आचरेकर बनायला काय हरकत आहे?

मंडळी वयाच्या जवळजवळ ३० वर्षापर्यंत माझा पत्रिका/ ज्योतिष याच्याशी संबंध आला नाही. लहानपणी कधीतरी आई-बाबांनी पत्रिका काढलेली होती. पण समजा त्यावेळी कुणा गुरुजींनी तू या विषयाचा अभ्यास करशील किंवा लेखन वगैरे करशील असे सांगितले असते  तर मी  यावर अजिबात विश्वास ठेवला नसता

 म्हणूनच मराठी गझलकार  भाऊसाहेब पाटणकरांच्या या ओळी मला पटतात. या  ओळींनीच हा लेख आवरता घेतो. धन्यवाद 🙏🏻

क्षणाक्षणाचे पडती फासे 🎲
जीव पहा हे रमलेले
पुर्वजन्मीचे संचित त्यांच्या 📝
भाळावरती सजलेले

जीवनातल्या या खेळात ♟
कुणी असते जिंकलेले 🏆
सगळं असत ठरलेले,
सगळं असतं ठरलेले 🎯

(ज्योतिषी अभ्यासक)अमोल केळकर
०३/०५/२०२० 📝
a.kelkar9@gmail.com
Related Posts Plugin for WordPress, Blogger...