इतिहासाचा तास ( त्रास ) सुरु झाला . लिमये मास्तर वर्गात आले. त्यांच्या हातातील बीजगणीताचे पुस्तक पाहून वर्गातील पोरांना जरा आश्चर्यच वाटले . अर्थात दोन्ही विषय लिमये मास्तरच शिकवत असल्याने तसा काही प्रश्ण नव्हता.
आल्या आल्या मास्तरांनी पोरांना सांगितले , मला कल्पना आहे इतिहासाचा तास आहे पण मी तुम्हाला आत्ता एक गणित घालणार आहे.
लिहून घ्या गणित
एका टोपलीत २८८ आंबे आहेत . यातील ' अ ' ग्रुपला १३५ आंबे पाहिजे आहेत, ' ब ' ला किमान १५० आंबे पाहिजे आहेत . ' क ' ग्रुपने सांगितले आहे की आम्हाला दोन अंकी आंबे पाहिजेतच नाहीतर आम्ही वेगळा विचार करू , ' ड ' चे असे म्हणणे आहे की त्यांनी स्वतंत्र पणे आंबे वेचायचे ठरवले तर त्यांच्या वाट्याला ५ तरी नक्की येतील , ' ई ' आम्हाला जर का मना सारखे आंबे मिळाले नाहीत तर आम्ही ही पिकणार नाही इतरांनाही नासवू
मुलांनो तर सांगा ' अ , ब, क, ड, ई ला किती आंबे मिळतील
गणित सोडवतानाची गृहीतके : -
१) या आंब्याचा एकत्र आमरस करून वाटून घ्यावा असे फालतू उत्तर नको
२) या टोपलीत असलेले आंबे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र , मराठवाडा , विदर्भ येथून आणून एकत्र मुंबईत भरलेले आहेत , वाटणी करताना या सर्व आब्यांचा विभागवार विचार केला नाही तरी चालेल
३) यात सर्व जातीचे ( हापूस, पायरी, रावळ , तोतापुरी ) आंबे आहेत. वाटणी करताना याचाही वेगळा विचार करायची आवश्यकता नाही
४) नासके आंबे टोपलीतून बाद ठरवू नयेत
याचे उत्तर तुम्ही मला पुढील गणिताच्या तासापर्यंत द्यायचे आहे . हे उत्तर तुम्ही स्वत: , किंवा २-४ जणांच्या ग्रुपने मिळून दिलेत तरी चालेल. जो कोणी अचूक उत्तर देईल त्याला किंवा त्या ग्रुपमधील एकाला मी वर्ग सेक्रेटरी करणार आहे.
चला बरं लागा कामाला…
लिमये सरांचा हुकूम सुटताच चिंटू , बंड्या, गोट्या लगेच कामाला लागले. यावेळेला तरी वर्गाचे सेक्रेटरीपद मिळायला पाहिजे यावर ते ठाम होते. वर्गातल्या त्यातल्या त्यात हुषार राजू ने ' एकाला ' चलो ची भूमिका घेऊन उत्तर शोधून ठेवायचे आणि वेळ्प्रसंगी इतर ग्रुपला मदत करून निदान उपसेक्रेटरी पदतरी मिळवायचे असा विचार केला. एका ' विनोदी ' स्वभावाच्या मुलाने आपला मोर्चा सरळ हुशार मुलींकडे वळवला आणि यावेळचे सेक्रेटरीपद मुलींमधूनच असं ठणकावून सांगितलं .
वर्गातील एका ' दादा' विद्यार्थाने डायरेक्ट त्याच्याहून ५ वर्ष मोठ्या असलेल्या भावाला ' विचारायचे ठरवले कारण त्याला पक्की खात्री होती की ५ वर्शापुर्वी लिमये सरांनी हाच प्रश्ण 'मोठ्या भावाच्या' वर्गातही विचारला असणार .
अशारीतीने सर्वजण आपापल्या पध्दतीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागले
लक्ष फक्त एकाच होतं
वर्गाचा सेक्रेटरी बनणे .
( क्रमश : )
संकल्पना : अमोल केळकर