नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, June 2, 2019

वडा, इडली रहस्य मोठे


मुंबईतील रस्त्यावरच्या खाद्यसंस्कृतीची काही रूपे सध्या व्हायरल झाली आहेत. यावरूनच  गदिमा/ बाबूजी यांचं
 'लळा जिव्हाळा शब्दच खोटे ' हे गाणे असे  लिहावेसे वाटले

वडा, इडली रहस्य मोठे
माशा , त्याही येई
घाब - रायचे नाही राजा, घाब रायचे नाही

'चटणी' कुठे रुप साधते या नगरीची माया ?
कोण जातो कुर्ला येथे, कुणी बोरिवलीत खाया
करताच मागणी नुसती,  जो तो आपुले पाही

'घाम'- टायचे नाही राजा, घाब रायचे नाही.

इथे रस्त्यावर गाड्या जमवी, जीलबी काढी कोठे?
पाणीपुरी खाऊन जगती, चाकरमानी छोटे
अतिक्रमणाची येता फेरी, भय्या पळून जाई
कुणी कुणाचे नाही, वेड्या कुणी कुणाचे नाही

📝अमोल
# मुळ गाणे- लळा, जिव्हाळा शब्दच खोटे

Wednesday, May 29, 2019

नारद जयंती


नारायण नारायण 🙏🏻🌺

आज देवर्षी नारदमुनी यांचा वाढदिवस. आपल्या परम भक्ताच्या जन्म दिवसा प्रित्यर्थ  विष्णूलोकात आज जंगी कार्यमाचा बेत श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांनी ठरवला आहे.
वेगवेगळ्या लोकातील देव, ऋषीमुनी,  नवग्रह, गंधर्व,  अप्सरा यांना निमंत्रणे गेली आहेत. कमळाच्या 'कळीचे ' चित्र असलेला केक बनवला जात आहे..
  जे विष्णू लोकात *बाहेरुन* येत आहेत त्यांना 'विष्णू आय टी' सेल प्रमुख चित्रगुप्त " *विष्णू लोक्यं, परम सौख्यं*' या व्हाटस अप ग्रुपवर तातडीने सामील करुन घेत आहेत जेणेकरुन त्यांना कार्यक्रमा संबंधित सर्व अपडेटस देता येतील.

तिकडे कैलासावर मात्र वेगळीच गोष्ट घडलीय. ऐनवेळी महादेवांनी आपण येणार नाही आहोत तू मुलांना घेऊन जा असे 'पार्वती' ला सांगितले आहे. कारण विचारता महादेव सांगत आहेत, तिकडे " *केदारनाथला* माझा एक भक्त तपश्चर्येला कालपासून बसला आहे. मी असं त्याला सोडून वाढदिवसाला येणं बरोबर दिसणार नाही. तेंव्हा तुम्ही जावा आणि माझ्या शुभेच्छा नारदमुनींना द्या.

इकडे बाल गणेश आईला विचारतोय, माते वाढदिवसाला २१ मोदक असतील ना? यावर पार्वती माता गणेशाला रागावून सांगतीय, बास झाली हा तुझी नाटकं.  लक्ष्मी मावशी जे देईल ते गप्पगुमानं खायचं,  तिथे हट्ट चालणार नाही. नाहीतर मी फक्त कार्तिकेय ला घेऊन जाईन.  आणि काय रे तीन दिवसांनीतर संकष्टी आहे ना. यावेळेला थोडे जास्त मोदक करीन हा माझ्या सोन्याला.


बरं ऐक संकष्टी वरून आठवलं.  संकष्टीच्या दुस-यादिवशी हिंदुस्थानातील लोकशाही निवडणूकीची मतमोजणी आहे. एकाच मतदार संघातील उमेदवार तुझ्या दर्शनाला येतील. ते सगळे भक्त तुला अनोळखी आहेत म्हणून मुद्दाम सांगतेय, उगाच सगळ्यांना विजयी भव!  असा आशीर्वाद देऊन  जास्त 'माया', 'ममता' दाखवून त्रिशंकू परिस्थिती होऊ देऊ नकोस.


 बर आज संध्याकाळी  "इंद्र प्रस्थ कल्चरल फोरम " तर्फे काही अप्सरा खास कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात 'ब्रह्मदेवांना' लाईफ टाईम अॅचिव्हमेंट अॅवार्ड देणार आहेत. तर कार्यक्रमाच्या सुरवातीला 'सूर निरागस हो' हे गाणं तू म्हणणार का? असं ' माता सरस्वतीने'  विचारले आहे. तीच या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पण करणार आहे.

मग काय सांगू ? हो म्हणून सांगू?

' हो '

अं?

हो हो, म्हणून सांग. मी तयार आहे

अहो.

काय हो, हो करताय ? कशाला तयार आहात?

उठा लवकर.  आज रविवार असला तरी. मेलं रविवार काय अन कुठला वार काय,  सकाळी उठून चालू लागायचं,  वार्तांकन काय एक्झिट पोल काय,  रिपोर्ट काय.

पण आज संध्याकाळी जरा लवकर या
*नारद फाॅंडेशनचा 'यशस्वी पत्रकार' पुरस्कार घ्यायला जायचंय आपल्याला. लक्षात राहू दे*.

हो हो. आहे लक्षात,  चल आवरतो
----------------------------
*२४ x ७ पत्रकारितेला वाहून घेतलेल्या आणि त्यासंबंधीत क्षेत्रात काम करणा-या तमाम बंधू/ भगिनींना*

तसेच
क्षणात फेसबुक,  व्हाटस अप वर ब्रेगिंग न्यूज पाठवणा-या

तसेच

आपल्याला विचारलं नसताना , त्या विषयाशी आपला संबंध नसताना, गरज नसताना, काहीही  प्रतिक्रिया देऊन मूळ विशष भलतीकडेच वळवणा-या सर्व
  व्हाटस अप ग्रुप मधील *सर्वच बुध्दीमान 'नारद' बंधूंना*
     🌷  *नारद जयंतीच्या* 🌷
               *शुभेच्छा*
                   🙏🏻

नारायण, नारायण 🙏🏻🌺
नमो 'केदार'नाथ 🙏🏻🌺
जय श्रीराम 🙏🏻🌺
मोरया 🙏🏻🌺

📝अमोल
१९/५/१९
poetrymazi.blogspot.in

दूर आर्त सांग कुणी छेडली 'आसावरी'




मंडळी नमस्कार. 🙏🏻

मध्यतंरी ' केदार ' रागावर लिहिलेले अनेकांनी आवडलं असं कळवलं आणि उत्साह वाढला.  याच लेखनमालेत  दुसरा लेख घेऊन येतोय.
यात आपण 'आसावरी '  रागातील काही गाणी पाहू. मागच्या वेळेला काही जणांनी  'फक्त मराठी गाणीच का? असा राग आळवला ( अर्थात ती त्यांची प्रेमाने केलेली तक्रार / सूचना होती )
त्यामुळे या भागात मराठी गाण्यांबरोबरच काही हिंदी गाण्यांचा ही समावेश केला आहे.

 अर्थात मागच्यावेळेप्रमाणेच इथे ही आपल्याला  रागा संबंधीच्या शास्त्रीय गोष्टीत जसे आरोह, अवरोह , वादी , संवादी , कोमल रिषभ , शुध्द् रिषभ  यात पडायचे नाही . आपण फक्त  काही हृदयस्पर्शी गाणी आठवायची आणि त्यानिमित्याने आपल्या हृदयाशीच गुणगुणायची .

बस ! हाच हेतू आहे या लेखन मालेचा

चला पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन सुरु करू

देव दिसे ठाई ठाई
भक्त लीन भक्तापाई
सुखालागी आला या हो
आनंदाचा पूर
अवघे गर्जे पंढरपूर , चालला नामाचा गजर

' गोरा  कुंभार ' नाटकातील अशोकजी परांजपे यांनी लिहिलेले हे गीत  या आसावरी रागातील. गायिका 'मंजुषा पाटील' यांनी गायलेली या गाण्याची एक छान ध्वनीफीत माझ्याकडे आहे. 'माऊलीच्या' असंख्य भक्तीगीता मधील हे एक माझे आवडते गाणे.

याचप्रमाणे  राम फाटक यांनी संगीत दिलेली  'संत नामदेव' यांची रचना
 तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल
 देव विठ्ठल , ' देवपूजा ' विठ्ठल

'आसावरी' रागा बद्दल माहिती  बघताना एके ठिकाणी याचा उल्लेख 'हृदयस्पर्शी आसावरी ' असा वाचला . खरच वरची ही विठूमाऊलीची गाणी वाचून/ ऐकून याची प्रचिती येते.

बघूया  या  रागाची आणखी जादू  अर्थातच
"जादू तेरी नजर , तू है मेरी किरण"  - डर  या हिंदी सिनेमातील हे गाणे अजूनही अनेकांच्या हृदयाचा ठाव घेऊन आहे.

भावगीतातील मंगेश पाडगावकर/ यशवंत देव या जोडीचे हे एक गीत

मी मजला विसरावे
बुडुनि सुरातच जावे
बासरी न दूर सखे, ती  माझ्या अंतरी

दूर आर्त सांग कुणी छेडली 'आसावरी'
पारिजातकुसुमे ही उधळिली मनावरी

हृदयस्पर्शी का भावस्पर्शी तुम्हीच ठरवा.

 लता दीदींनी गायलेले 'बडी बहन' या हिंदी सिनेमा मधले
'चले जाना नाही नैना मिलाके'   किंवा दीदींनीच गायलेले ' लो आ गयी उनकी याद '  हे दो बदन या हिंदी सिनेमातील गाणे असेल. एका पेक्षा एक गाणी म्हणता येतील ही.

'आसावरी राग' आपल्याला काही संगीत नाटकातून ही  भेटतो

'संगीत मृच्छकटिक' या नाटकात देवल लिहितात
काय वंदीन मी ती सुमती ! नवयुवती अबला साश्रुलोचना !
धरुनी कुरलकुंतला या हाती !!

' संगीत मानापमान ' मध्ये खाडिलकरानीं  रचलेले पद :-
प्रेमभाव जीव जगी या नटला ! एकचि रस प्याला !!

तर ' संगीत शारदा' मध्ये  बालगंधर्व गातात :-
हासु  काय सुटले मी म्हणुनी
का रडूं हे मस्तक पिटूनि
लग्न होय कीकुंवार अजुनी
हरहर देवा काय विडंबन !!
( चला शेवटी विडंबन हा शब्द आसावरी रागातील एका नाट्यपदांत मिळाला तर 🙂)

मंडळी छान वाटलं ही काही जुनी गाणी आठवून ?
लेख आवरता घेण्यापूर्वी एक अवांतर :  जसं ' केदार ' नावाबद्दल काही ऋणानुबंध होते तसेच ' आसावरी' या नावाशी  ही आमचे ऋणानुबंध आहेत.
 ' आसावरी वाईकर '  ( माहेरची केळकर ) सध्या चेन्नई स्थित ही आमची मैत्रीण . मैत्रीण म्हणण्यापेक्षा छोटी बहीणच म्हणू. आता तिची अधिक ओळख ' अभिजात शास्त्रीय संगीत गायिका'/ शिक्षीका म्हणून करून देऊ की एक मराठी साहित्य  क्षेत्रातील 'उदयोन्मुख लेखिका' अशी करून देऊ हा जरा प्रश्नच पडलाय मला. सध्या तरी या दोन्ही क्षेत्रात तिने अतुलनीय यश मिळवले आहे. तिच्या पुढील वाटचालीस  शुभेच्छा. 
शाळेतल्या कुठल्याही कार्यक्रमाला
 'स्वागत गीत' म्हणणारी आसावरी ( सोबत नीलांबरी, संजीवनी )  आणि हर्मोनियम वाजवायला अस्मादिक ही जुनी आठवण. त्यावेळी आमच्या टुकार पेटीवादनाला सहन करून सांभाळून घेणारी आसावरी  ते  अगदी  काल आईला फोन करून अमोल 'चांगला लिहितो'  हे आवर्जून सांगणारी आसावरी. असे कौतुकाचे शब्द मिळाले की 'टूकारपणा ' करायला जास्त हुरूप चढतो. असो .😊

तर  या लेखनाचा शेवट
 ( ' आसावरी रागांतीलच ' ) एका छान गाण्याने

कुठे कुणाच्या घडल्या भेटी,
गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयाची गाथा,
सूर अजूनही गाती

अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवुनी जाती
दोन दिसाची रंगत संगत , दोन दिसाची नाती

भेटू परत कधीतरी , कुठला तरी राग घेऊन

 📝अमोल केळकर
poetrymazi.blogspot.in
२९/०५/१९

Saturday, May 11, 2019

मेगा ब्लाॅक


# मेगा ब्लाॅक

नमस्कार मंडळी 🌺🙏🏻

खरं म्हणजे 'मेगा ब्लाॅक' हा मुंबईकरांसाठी तरी काही नवीन शब्द नाही. मी चुकत नसेन तर गेली साधारण २० ते २२ वर्षे  काही अपवाद वगळता प्रत्येक रविवारी मुंबईच्या मध्य, पश्चिम,  हार्बर रेल्वे मार्गावर दरवेळेला वेगवेगळ्या ठिकाणी या मार्गाच्या तंदुरुस्ती साठी जे काम हाती घेतले जाते त्याला मेगा ब्लाॅग म्हणतात
सोमवारी पहाटे ४ वाजल्यापासून शनिवारी रात्री १२ वाजेपर्यत अखंडपणे मुंबईची ही जीवनवाहिनी व्यवस्थित रहावी यासाठी हे सगळे प्रयोजन.
मला आठवतंय अगदी सुरवाती- सुरवातीला एखाद्या भागात काही तांत्रिक अडचण येऊन रेल्वे सेवा विस्कळीत झाली, ओव्हरहेड वायर तुटून गाड्या बंद पडल्या, सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला म्हणून त्रास झाल्यावर तातडीने येणा-या रविवारी  त्या भागात 'मेगा ब्लाॅक ' घेऊन काम करण्यास सुरवात झाली.

हे सगळे अडचणीवर मार्ग म्हणून सुरु झाले. पण कालांतराने कुठल्याही प्रकारची अडचणच उद्भवू  नये म्हणून ( इन अॅन्टीसिपेशन)  सर्व विभागांचे व्यवस्थित नियोजन करुन 'मेगा ब्ला‌ॅक' घेण्यास सुरवात झाली आणि आज तो तमाम मुंबई करांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झालाय.

नाही म्हणले तरी सुरवातीला थोडा त्रास झाला. एखाद्या विभागातील 'जलद' किंवा धीमा मार्ग दुरुस्ती/ तंदुरुस्ती साठी बंद केल्यावर दुस-या चालू मार्गावर गर्दी होऊ लागली. काही स्थानकात  जलद लोकलला फलाट नसल्यामुळे तिथे उतरणाऱ्यांना पुढे उतरून मग रिक्षा/ बस असे पर्याय बघावे लागले. तिकडेही ओघाने गर्दी वाढली. तासाभराच्या प्रवासास दोन दोन तास जाऊ लागले.
खरं म्हणजे रविवारी सर्व कुटुंब एकत्र कुठेतरी प्रवासास जायचा दिवस. पण हे जाणे अत्यंत कठिण काम होऊन बसले. हा त्रास मुंबईकर सहन करत गेले आणि कालांतराने  त्याचे फायदे दिसायला लागले.

सोमवार ते शनिवार रेल्वे प्रवासातल्या तांत्रिक अडचणी कमी होऊ लागल्या. लोकल वेळेवर धावायचे  प्रमाण वाढले आणि आजकाल " आज या मार्गावर 'मेगा ब्लाॅक' नाही " ही बातमी ठरु लागली.

मंडळी तुम्ही म्हणाल हे काय टुकार लेखन? 👆🏻बरोबर आहे असे वाटणे. पण आता हीच मेगा ब्लाॅकची कल्पना आपण आपल्या व्यक्तीगत आयुष्यात अगदी दर रविवारी नाही निदान महिन्यातील / दोन महिन्यातील एखाद्या रविवारी वापरली तर?

आता व्यकतीगत आयुष्यात कशाचा 'ब्लाॅक' घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्ण. कुणी स्वत:च्या अंतर्मन तंदुरूस्त राहण्यासाठी ब्लाॅक घेईल, कुणी एखादी घरातील खोली आवरायला काढेल , कुणी गाडीची देखभाल करेल तर कुणी 'आठवणींचा' मेगा ब्लाॅक घेईल.

तर करताय ना सुरवात एखाद्या रविवारी ' आवश्यक ब्लाॅक ' घेऊन पुढचा मार्ग निश्चिंत करायला?

आणि हो हे ज्यावर तुम्ही वाचत आहात ( आणि मी लिहित आहे) त्या मोबाईलच्या ही 'मेगा डेटा'ची साफसफाई करुन त्याचाही अधूनमधून 'ब्लाॅक' घ्यायचा लक्षात राहू दे 😬

📝१२/५/१९
माझा ब्लाॅग
poetrymazi.blogspot.in

Saturday, May 4, 2019

दाखव रे ती मार्कलिस्ट


रविवारची टुकारगिरी 📝

सुप्रभात मंडळी 🙏🏻

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार
ख-या अर्थाने रंगला तो "दाखव रे तो व्हिडिओ" या प्रकाराने. आपल्याला याच्या खोलात किंवा पुढच्या "राज"कारणावर चर्चा करायची नाही आहे. मात्र या घटनेने मला शाळेतल्या दरवर्षीच्या निकालाची आठवण आली.
साधारण एप्रिलच्या शेवटी प्रत्येक वर्षीचा निकाल लागायचा. त्यानंतरचे साधारण आठवडाभर आम्हाला घरी जणू युद्धाचा प्रसंग असायचा. घरगुती 'सर्जिकल स्ट्राईकच' असायचा तो आमच्यावर. कारण निकालानंतर घरी येणाऱ्यांकडून मग ते नातेवाईक असोत परिचित असोत , त्यांच्याकडून विचारणा व्हायची काय लागला का रिझल्ट?
' हो '
किती मार्क पडले? 
 x x %
( वाचकांसाठी,  आम्हाला मार्क हे नेहमी महाराष्ट्रात निवडणुकीत होणा-या सरासरी मतदानाइतकेच मार्क असायचे,  त्यामुळे xx असं लिहिले आहे. तुमच्या माहितीत जी सरासरी आहे तेवढे आमचे मार्क धरायला हरकत नाही 😁 )

तर मार्क कळल्यानंतर हा विषय संपायला नको का?
पण आमचे नशीब कुठे इतके साधे?

त्या पाहुण्यांसमोर कधी पूजा करत असलेले बाबा किंवा चहा करत असलेली आई फर्मान सोडायची
" दाखव रे ती मार्कलिस्ट " 📝😐

यानंतर आमची मार्कलिस्ट त्या घरी आलेल्याच्या हातात जायची. तो ही आपण केळकरांकडे कुठल्या कामाला आलोय हे विसरून मस्त पैकी अॅनॅलिसिस/ विश्लेषण करायला लागायचा.
( आज निवडणूक झाल्यावर वेगवेगळ्या वाहिनींवर विश्लेषण करणारे पाहिले की मला वाटते यातल्या  काहीजणांनी नक्कीच माझी मार्कलिस्ट पाहिली असणार 😉)

तर त्यांचे विश्लेषण सुरु
मराठीत फक्त एवढेच? अरे लेखिकेचा मुलगा ना तू? पेपर मोकळा लिहून मार्क नाही मिळत.

हे काय ? सगळेजण तुझ्या काकूकडे संस्कृत शिकायला जातात आणि तूला ९० पण नाहीत?

हं त्या गणितातील मार्काने जरा लाज राखली म्हण की.

इ इ इ इ

तर मंडळी,  "दाखव रे ती मार्कलिस्ट " हा प्रकार पुढे साधारण १०-१२ दिवस तरी चालायचा. अगदी घरी कामाला येणा-या मावशी, आईच्या काॅलेजचा शिपायी, बाबांकडे कुणी कामानिमित्याने आलेले या सगळ्यांच्या ( त्यांना त्यातले कळो वा न कळो ) एकदा तरी त्यांच्या हातात आमची मार्क-लिस्ट गेलीच गेली.  पण चुकूनही त्या ८-१० दिवसात आमच्या घरी येणाऱ्यांना  " दाखव रे ती मार्कलिस्ट" असं सांगायला आई-बाबा विसरले नाहीत.

८-१० दिवसानंतर मात्र हे कमी होत जायचे. कारण घरी येणाऱ्या व्यक्तींच्या पाल्याचे ही निकाल लागलेले असायचे. मग x x हे आमचे %  ऐकल्यानंतर जर त्यांच्या मुला/ मुली पेक्षा मार्क कमी असतील तरच मार्कलिस्ट बघितली जायची. नाहीतर आई-बाबांना कडून आलेल्या "दाखव रे ..." ला राहू दे राहू दे. जरा गडबडीत आहे. नंतर बघतो वगैरे उत्तर मिळायचे 🤭.

या सगळ्यातून सुटका होण्यासाठी  निकाल लागला की पुण्या-मुंबईला केंव्हा पळतोय  इकडेच आमचं लक्ष लागून रहायचं 🤪

लहानपणीचा  " दाखवरे ती मार्कलिस्ट" ते " आजकालचा "दाखव रे तुझा छापून आलेला लेख " इथपर्यंत हा प्रवास येऊन थांबला आहे.

जो आता सुखावह वाटतोय 😊

📝अमोल
poetrymazi.blogspot.in
५/५/१९

Friday, May 3, 2019

उत्प्रेरक


🔅🔆 उत्प्रेरक -(अर्थातच कॅटॅलिस्ट) 🔆🔅

मंडळी 🙏🏻
मला वाटत आपण ८ वी  ते  १० वी मध्ये कुठल्यातरी वर्षी रसायन शास्त्र या विषयात हा विषय शिकलोय . 'उत्पेरकाची' शास्त्रीय दृष्ट्या व्याख्या :-
"ज्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे एखाद्या रासायनिक विक्रियेचा/प्रक्रियेचा वेग बदलतो अशा पदार्थाला उत्प्रेरक म्हणतात व या क्रियेला उत्प्रेरण म्हणतात".
ब-याचदा हा  उत्प्रेरक प्रत्यक्ष भाग घेत नाही पण त्याच्या उपस्थितीमुळे  मात्र इतर सुप्त घटक अचानक जागे होऊन  रासायनिक क्रिया घडते ( घटना घडते )

मंडळी , प्रत्यक्ष आपल्या जीवनातही असे अनेक उत्प्रेरक कळत-नकळत  येतात जे आपल्याला मदत करून जातात ,आपल्या जीवनाला कलाटणी देतात, या घटनेनंतर  मी बदललो, माझ्यात बदल झाला  असे आपणास वाटायला लागते .
अशा सर्व घटना, संबधीत व्यक्ती, परिस्थिती  हे आपल्यासाठी उत्प्रेरकच . प्रत्येकाने हे उत्प्रेरक आपापले शोधायचे .

काही उत्प्रेरकांचा सरळ सहभाग असतो.  उदा. आपले पालक - नातेवाईक , मित्र , शिक्षक इ, जे आपल्याला वेळोवेळी  भानावर आणतात , रागवतात , टोचून बोलतात  पण हे ते सगळं करतात ते आपल्या भल्यासाठी. आपल्यातील सुप्त गुण ( चांगले )  वाढीस लागून एका विशिष्ट दिशेने  ( फोकस)  आपला प्रवास व्हावा असा त्यांचा  उद्दात्त  हेतू असतो. कधी कधी मला असे वाटते 'निंदकाचे घर असावे शेजारी ' असे म्हणले जाते ते याच आपल्या फायद्यासाठी.

काही  उत्प्रेरक  आपण लांबून बघतो, टीव्हीवर बघतो , काही आपले आदर्श असतात पण त्यांचा  प्रत्यक्ष  आपल्याशी कधी संबंध आलेला नसतो. ते  आपल्याला अनेक गोष्टी शिकवतात, आपल्याला वेगळा विचार करायला भाग पाडतात. आपल्या यश -अपयशाचा त्यांच्यावर  काहीही परिणाम  होणार नसतो, ते आपल्याला ओळखतही नसतात  पण त्यांच्या  बाबतची एखादी गोष्ट , घटना आपल्याला मात्र एखादे  ध्येय ठेऊन वाटचाल करायला प्रवृत्त करते.   
अरे काय काढली मॅच त्याने ! वाटलं नव्हतं जिकेलं, अशी घटना आपल्याला स्फूर्ती देऊन जाते ( अशक्य वाटणारी  गोष्ट प्रत्यक्षात घडणे).
 एखाद्या  वक्त्याचे व्याख्यान, एखादे प्रवचन,  एखादे  ऐतिहासिक पुस्तक , सिनेमा  , लहान वयात यशाच्या शिखरावर गेलेल्या व्यक्ती , एखादं मस्त गाणे ,  मित्रांबरोबरची / समवयस्क व्यक्तींबरोबरची  सहल, सूर्योदय / किंवा सूर्यास्ता वेळचे विलोभनीय दृश्य  इ इ इ

 अशा उत्प्रेरकांना शोध आपण आपल्या पद्धतीने घ्यायचा.  कधी कधी  आपण स्वतः :इतरांसाठी असा उत्प्रेरक बनायचं. 

खाली लिहिलेली काही वाक्य -ve म्हणून वापरलेली आपण नेहमीच बघतो/ ऐकतो,  पण ही वाक्य आपण एक चॅलेंज म्हणून घेतली तर यांच्यासारखा उत्पेरक नाही. आता जेंव्हा केंव्हा अशी वाक्ये 👇🏻ऐकाल तेंव्हा हे लिखाण आठवा आणि दुप्पट जोमाने कामाला लागा 😉

🗣तुला आयुष्यात काहीही जमणार नाही
🗣एक गोष्ट व्यवस्थित केलीस तर शप्पथ
🗣हे ! शक्यच नाही तूला जमणे.
🗣तुझे  काय कर्तृत्व ? सगळं आयत मिळालय  तुला ?🤭
🗣काय टुकार / सुमार/ घाणेरडं  लिहितोस.
 इ इ इ इ. 😛

'कौतुकाचे दोन शब्द' जसे जरुरी आहेत तसेच ही 'उत्प्रेरके' ही 'मोलाची' आहेत हे नक्की

मंडळी, कधी कधी  गावाबाहेरच्या  देवळात  जाऊन ( गर्दी नसलेल्या ठिकाणच्या )
गाभा-यातील मूर्तीला  मनापासून केलेला नमस्कार आणि त्यातून मिळालेली आंतरिक शांती , समाधान हे पण एक वेगळे उत्प्रेरकच नाही का?
घेतलाय तुम्ही हा स्वर्गीय अनुभव ????

या लेखनाची समाप्ती श्री रामदास स्वामींच्या या काही ओळीने  🌷

हवाया नळे बाण भांडी अनंते !
बळे सोडितां जाति आकाशपंथे !
बती लागता वेळ नाही उठाया !
तयाचे परी स्फूर्ती दे देवराया !!

सर्वांचे कल्याण होऊ दे हीच इच्छा 🙏🏻

📝अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com
poetrymazi.blogspot.in

Saturday, April 27, 2019

जंगलातील निवडणूक


🌳🌳
जंगलातील निवडणुकीचे अनोखे पर्व, मतदान करा सर्व
🌳🌳

काल निवडणूक प्रचार भाषणात एका ठिकाणी लांडगे- कोल्हे - वाघ - सिंह ऐकायला मिळाले.

 मग काय सुचलं आणि लिहिलं😉
--------------------
जंगलामधल्या प्राण्यांची ,भरली होती 'सभा'
'पोपट' होता 🦜 'सभापती ' मधोमध उभा 🎤

पोपट म्हणाला,
पोपट म्हणाला,
मित्रांनो,
'राज' कारणात लूट
चातुर्याने मतदानाला
सर्वांना सूट.

या ' मताचे ' कराल काय 👆🏻

नंतर सगळ्या जंगलातल्या प्राण्यांनी काय काय करणार ते सांगितले
🐘🦓🐆🦒🐕🐎🐅🐋🦚🐈

गाय म्हणाली, " येता जाता मतदानाने वाढवीन आशा "

घोडा म्हणाला, "ध्यानात ठेवीन,ध्यानात ठेवीन. मी ही माझ्या बोटाने 👆🏻असेच करीन, असेच करीन"

कुत्रा म्हणाला, " खुषीत येईन तेंव्हा NOTA दाबणार नाही"

मांजरी म्हणाली,  "नाही ग बाई, कुत्र्यासारखं माझं मुळीच नाही
मतदानादिवशी घरीच बसीन, घरीच बसीन"

खार म्हणाली, "चढेल धुंदी तेंव्हा माझ्या पक्षाची मलाच बंडी "

माकड म्हणाले, " कधी इथे, कधी तिथे , माझ्या मताने वाढतील धोके

मासा म्हणाला, "मतदान म्हणजे कर्तव्य जाण , दुस-याला हे शिकवीन छान"

मोर म्हणाला,  वार्ड वार्ड जहिरात करीन, संध्याकाळी मतदान करीन

 पोपट म्हणाला

छान,  छान, छान

संवि धानाचा ठेवा हा मान
दिलेल्या हक्काचा वापर करा
नाहीतर काय होईल?

सगळे प्राणी : काय होईल?

*पुण्यातील ( बिन शेपटीच्या) माणसांसारखे सगळे आपले हसे करतील*

हा!  हा! हा!  😂😅🤣
🙈🙉🙊

📝 विसंगती सदा मिळो
२७/४/१९

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Saturday, April 20, 2019

ए ऐकव रे विडंबन


ए ऐकव रे विडंबन... 📝

( चाल: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे)

कुणाच्या भाषणावर कुणाचे वाजे?
कुणाचे वाजे?

कशासाठी उतरावे सभा लावून?
कोण बोले कुणासाठी दाखले देऊन?
जमतात येथे कुणी भाडे हे घेऊन
तरी यांना मिळतात 'चलचित्र' ताजे?

कुणाच्या भाषणावर कुणाचे वाजे?
कुणाचे वाजे?

आश्वासने जाती येथे, विरून विझून
दिन सच्चे अंधारात तसेच पडून
गावातून लागती पैजा  घोकून घोकून
दावती हे वेडे भक्त, तरी आम्ही राजे !

कुणाच्या भाषणावर कुणाचे वाजे?
कुणाचे वाजे?

अंतनको अस्ताआधी, पक्ष नको व्याधी
भाषणांना गर्दी म्हणजे पोकळ समाधी
देई कोणी वाटा त्याचा बडेजाव आधी
जिंकण्याआधी हारणे हे तुम्हा नाही साजे

कुणाच्या भाषणावर कुणाचे वाजे?
कुणाचे वाजे?

📝 विसंगती सदा मिळो........
१८/४/१९

Tuesday, April 16, 2019

आपुलकीची जेथ प्रचीती, तेथ पाय माझे वळती


*

मंडळी नमस्कार. 🙏🏻

आठवड्याच्या सुरवातीला एक वेगळा विषय मांडतोय. वेळ १७ मिनिट. जुईनगरला लोकल मधे बसलोय ऐरोलीत उतरेपर्यत जेवढे लिहिता येईल तेवढेच लिहितोय.

साधारण १५ एप्रिल आली की वेध लागतात मे महिन्यात गावी जायचे. सुट्टीचे प्लँनींग सुरू होते. त्याचवेळेला गावी कोणकोण नातेवाईक येणार याची विचारणा सुरू होते. तशीच एक उत्सुकता असते आपल्या शाळेतले गाव सोडून गेलेले  कोण कोण मित्र भेटणार?  ते आपण येणार आहोत त्याच वेळी येणार का?

सोशल मिडियामुळे आजकाल एकमेकांशी संपर्क रहात असला तरी प्रत्यक्ष भेटण्यातली मजा काही वेगळीच. पण आता झालंय काय की मित्राला विचारले आणि त्यांनी सांगितले की अरे यार, तू जेंव्हा गावी येणार आहेस त्याच्या पुढल्या आठवड्यात मी येणार आहे आहे रे. यावेळेला तरी आपली भेट शक्य नाही.

खरं म्हणजे नाॅर्मली इथे विषय संपतो. पण या वेळच्या गावच्या भेटीत आपण वेगळं करू या.

मित्र / मैत्रीण येणार नसतील तर काय झालं.? आपण गावाला गेलो की निदान त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-बाबांना भेटून, लहानपणीच्या आठवणी जागून,  त्यांची विचारपूस करुन त्यांचा हातचा खाऊ परत खाऊन आलो तर? थकलेल्या त्या काका- काकूंना नक्कीच बरं वाटेल.

माझा मित्र दुबईला राहतो. तो जाता- येता मुंबईत भेटतो. पण पूर्वी ज्या हक्काने मी तिन्ही त्रिकाळ त्याच्या घरी रमायचो, आज किती वर्ष झाली गेलोच नाही आहे.
यंदा मी ठरवलयं जाऊन यायंच. वयाने आपलेे पालक वृध्द झालेत खरे पण आपली एक भेट त्यांना या उन्हाच्या तडाख्यात  गारवा देऊन जाईल.
तेंव्हा मी नसतानाही आमच्या गावच्या घरी तुमचे स्वागत 🙏🏻

ऐरोली आलं. उतरायला पाहिजे

*ओढ लागली अशी जिवाला गावाकडची माती*

📝 अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com

Tuesday, April 9, 2019

एक रस्ता आ s हा , आ s हा


🛣 एक रस्ता  आ s हा , आ s हा  🛣

मंडळी  नमस्कार 🙏🏻
आज एक वेगळा विषय मांडतोय.( जरा निवडणूक रणधुमाळीतून थोडासा बदल समजा.)

 ' प्रवास '  हा  अनेकांचा आवडता विषय असतो. अनेक जण अनेक प्रकारे प्रवास करतात. कुणी रस्त्याने , कुणी रेल्वेने तर कुणी हवाई प्रवास करतात. पण असे काही मार्ग असतात की त्या खास मार्गावरून जायला प्रत्येकाला कधीच कंटाळा येत नाही.  रोजच्या कामाच्या ठिकाणी वगैरे जायचा हा मार्ग नाही बरं का ! ( तिथे तर मनात असो नसो जावंच लागतं.)

असा मार्ग ,जो केव्हाही जा , कधी ही जा फक्त आनंदच देतो.

तर मंडळी, माझ्यासाठी  सारखा सारखा प्रवास करावासा वाटणारा, कधीही कंटाळवाणा न वाटणारा एक रस्ता आहे .  माझ्या घरा पासून ते मुक्कामाचे ठिकाण असा हा मार्ग साधारण १३० किमीचा आहे. आणि दोन एक महिन्यातून एकदा तरी या मार्गावरून  गेल्या शिवाय मला चैनच पडत नाही. 😊

हा मार्ग चार टप्य्यात मी विभागलाय .  माणसाच्या कशा साधारण चार अवस्था असतात १)बाल २) कुमार ३) तारुण्य आणि ४) वार्ध्यक्य
( धर्म , अर्थ , काम , मोक्ष )
तशाच माझ्या मार्गाच्या ही 👆🏻या चार अवस्था आहेत.

साधारण ३०- ३५ किमीचे  प्रत्येक टप्पे . प्रत्येक टप्पा पार करायला लागणारा वेळ ३० मिनिटे. असा हा दोन तासाचा प्रवास.

तर घरातून निघालो की पहिला टप्पा, बाल्य: जशी लहानपणी आपली बालसुलभ भावना असते , एक आनंद , उत्साह , थोडीशी हुरहूर प्रवास कसा होईल याबाबत थोडी भिती. असा हा पहिला टप्पा.
 पहिल्या टप्प्याचा काही कि.मी. शिल्लक असताना  लागणारे दोन बोगदे जणू  वडीलधारी पालक. जाणीव करून देतात की  आता लहान नाहीस, खेळ बास , मजा बास थोडा सिरिअस हो,अभ्यास वाढणार आहे , लक्ष असू दे,

मग  दुसरा टप्पा सुरु -  कुमार . थोडी जबाबदारीची जाणीव , झालेल्या चूकाातून शिकणे . गाडीच्या वेगावर नियंत्रण , ब्रेक न दाबता समोरून आरामात चालना-या गाडयांना ओलांडून पुढे कसे जायचे , मागून येऊन किरकिर कारणा-या गाडयांना पुढे सोडणे , योग्य वेळी योग्य गियर , असे करत करत  , थोडासा अॅरोगंटपणा पण वाढत्या जबाबदारीच्या जाणीवेने हा २५-३० किमीचा  अवघड वळणाचा , घाटाचा टप्पा पार करत क्षणभर विश्रांती साठी थांबणे. हा टप्पा पार करे पर्यत अनेकांच्या डोक्याला झिणझिण्या येऊन  अगदी अमृतांजन लावावे असे वाटण्यासारखी परिस्थिती.

चहा नाश्टा करून मग तिस-या टप्प्याला सुरवात करायची .
 त्यामानाने हा टप्पा जास्त  सुखकारक . रस्ता ,  परिसर , गाडी यावर अगदी व्यवस्थित कंट्रोल आलेला असतो. जणू जीवनात आता रुटीन सेट झाले आहे. मस्त पैकी पाचवा गिअर टाकून एका वेगात गाडी जात आहे . फक्त आपल्या समोरच्या लेन मधून हळू जाणा-या गाडयांना शिताफने चुकवून, न कळत , अलगद , न दुखावता, हाँर्नचा आवाज न करता त्यांना ओलांडून पुढे जाऊन परत आपल्या मूळ लेन मध्ये लागणे , अतिशय घाई असणा-यांना आपला वेग कमी न करता पुढे जाऊ देणे.
बस "गोल्डन टाइम " हाच

चौथा आणि शेवटचा टप्पा  मुक्कामाचे ठिकाण घेऊन जाणारा. नाही म्हणले तरी एक दिड तासाच्या प्रवासाने थोडासा कंटाळा आलेला असतो. मुक्कामाच्या ठिकाणी पोचण्या आधी पुढे किती ट्रॅफिक जाम असेल याची चिंता  लागते , कसं होणार ? केव्हा पोहोचणार ? या विचाराने मनात काहूर माजलेले असते. जणू हा वृद्धत्व / निवृत्ती असा हा टप्पा . जे जे होईल ते ते पहावे अशी नकळत विचारसरणी करून देणारा हा टप्पा .
अंमल उदासीनपणे , वाट बघ बघत , ज्या नियोजित वेळेला पोहोचू असे वाटत असते त्या वेळे पेक्षा थोडा उशीर करून शेवटी आपण मुक्कामाला पोहोचतो

मंडळी  असा माझा हा प्रवासाचा आवडता  रस्ता आणि चार टप्पे.  कसा वाटला?

अरे हो  आता तो रस्ता कुठंला हे सांगणे ही एक फॉर्मेलीटी. कारण हा कुठला रस्ता हे
ब-याचजणांनी ओळखलं असेलच.

ज्यांनी ओळखलं नाही त्यांना सांगतो,
 हा माझा आवडता रस्ता  आहे तो # मुंबई- पुणे मेगा हायवे . आणि प्रवासाचा मार्ग  बेलापूर ते कोथरूड

पहिला टप्पा-   घर ते - खालापूर टोल नाका
दुसरा टप्पा- खालापूर टोल नाका ते  - लोणावळा .
तिसरा टप्पा - लोणावळा  ते तळेगाव टोल नाका
चौथा टप्पा - तळेगाव टोल-कात्रज बाय पास - ते -कोथरूड

मंडळी पण ही मजा फक्त मुंबई - पुणेच बरं का ! परतीची
पुणे - मुंबई अशी मजा नाही. कारण एक तर पुण्याहून आम्हाला निघायलाच नको वाटतं आणि मगाशी जे बाल, कुमार,तारुण्य , वार्धक्य या अवस्था किंवा धर्म , अर्थ , काम , मोक्ष असं जे म्हणलं तो मोक्ष आम्हाला परत येताना  पुण्यातील मित्रांनी दिलेल्या  बाकरवडी आणि आंबा बर्फीने केव्हाच मिळालेला असतो.

त्यामुळे आम्ही परतीचे राहिलेलोच नसतो 🙏🏻

📝अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com

मेगा हायवेवर अखंड पणे
 राबणा-या  आणि आमचा प्रवास सुखकर करणा-या परिचित अपरिचित सर्वांना सदर लेखन समर्पित
०९.०४.२०१९

Thursday, March 28, 2019

वाहिन्यांचे निकालास्त्र


वाहिन्यांचे निकालास्त्र 🛰

दिनांक : २२ मे ते २३ मे
ठिकाण : बातम्यांच्या गिरण्या

नमस्कार, सुप्रभात मी ' अमुक तमुक ' रणसंग्राम' २०१९, 'विजेता कोण?१९',  'राज्यग्रहण १९',  या कार्यक्रमात आपले स्वागत. या ठिकाणी जे आम्हाला बघत आहेत त्यांना सांगू इ्छितो की आत्ता सकाळचे ७ वाजले आहेत.  लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे हे तुम्ही जाणताच. उद्या मतमोजणी सुरु होईल.
या सर्वांचे " मेगा कव्हरेज " जवळजवळ ४८ तास फक्त फक्त आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.  तेंव्हा कुठेही जाऊ नका. पहात रहा फक्त ' न्यूज माझा'

ब्रेक नंतर परत एकदा तुमचे स्वागत. पुढे ४८ तासात इथे अनेक मान्यवरांना आम्ही पकडून आणू,  जे येणार नाहीत त्यांच्या घरी जाऊ. आज त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ,  उद्या निकाल लागत असताना ' काल मला असे बोलायचेच नव्हते, माझ्या बोलण्याचा विपर्यास केला आहे ' हे ही ऐकू. पहात रहा ' न्यूज पावलोपावली '

परत एकदा आपले स्वागत. इथे जी वरची पट्टी आहे तिथे संपूर्ण भारताचे लोकसभेचे आकडे आम्ही दाखवू. खालच्या बाजूला महाराष्ट्रातील बदलत्या निकालांची नोंद, प्रत्येक क्षणी ( अगदी तिकडे एका मशिनची मोजणी झाली की इकडे अपसेट) तुम्ही पाहू शकाल.
इथे डाव्या बाजूला आमचे अनेक वार्ताहर जे देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलेत त्यांच्याकडून आपण अपडेट्स घेणार आहोत. राहिलेल्या जागेत तुम्ही इथे स्टुडीओत आम्हाला , इथल्या चर्चा पाहू शकाल.
कुठेही जाऊ नका , बघत रहा 'न्यूजमत' आमचेच

ब्रेक नंतर परत एकदा स्वागत. या ठिकाणी सकाळी सकाळी महाराष्ट्रातील विभागवार नेते, आणि राजकीय विश्लेषक भाऊ, आणि तात्या आले आहेत. ती एक मोकळी जागा ( खुर्ची) दिसते आहे ते मान्यवर सकाळी मुंबईत ट्रॅफिकमधे  अडकल्याचे कळते.

तात्या काय वाटते तुम्हांला याबद्दल? अगदी थोडक्यात सांगा. 

मला वाटते त्यांचे चुकले. त्यांनी ठाण्याहून घाटकोपर पर्यंत जलद रेल्वे, घाटकोपर - अंधेरी मेट्रो आणी नंतर अंधेरी - एल्फिन्स्टन

तात्या , इथे एल्फिन्स्टन चे प्रभादेवी नाव झालयं. तुम्ही तर मराठीचे...

भाऊ, जरा थांबा- थांबा. मी तुमच्याकडे येणार आहे. भाऊ,भाऊ शांत व्हा.  तात्यांना त्यांचे म्हणणे मांडू दे

भाऊ शांत होईस्तवर आपण घेऊ एक ब्रेक. कुठेही जाऊ नका.

तर मंडळी ब्रेकवर जाण्यापूर्वी तात्या आपणास रेल्वेने स्टुडिओ त कसे पोहोचायचे सांगत होते.
 बोला तात्या .
तर अंधेरी हून त्यांनी जलद लोकल पकडून दादर पर्यत यावे आणि दादर हून धीम्या लोकलने प्रभादेवी गाठावी.

अलबत्या, तुम्ही सहमत आहात का तात्यांशी.

अजिबात नाही कारण गेल्या ५ वर्षात ठाण्याहून - प्रभादेवी पर्यत मार्ग सुरु व्हावा अशी अनेकांची मागणी होती.ती पूर्ण झाली असती ते हे मान्यवर वेळेत आले असते.

गलबत्या, तुमचे म्हणणे थोडक्यात सांगा. तुम्हाला १ मिनिटे देतो. आपल्याकडे विषय खुप आहेत. वेळ फक्त ४८ तास आहेत.

असं आहे बघा, लोकल फलाटावरुन निघायला पण १ मिनिटापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे तुम्ही वेळेत सुट द्यावी ही मागणी मी सर्वप्रथम करतो.
तर  हे जे घाटकोपरला उतरून अंधेरी मार्गे येणे हे म्हणजे 'काखेत कळसा, गावाला वळसा'  असं झालं. हे काय ' युती ' 'आघाडी' आहे का? आम्हाला सिट नाही तर आमचा उमेदवार तुमच्या जागेवरून पश्चिम उपनगरातून लढायला?
ठाणे लोकलने सरळ परळ स्थानकात उतरून रेल्वे ब्रीज ओलांडला की प्रभादेवी येते.

रेल्वे ब्रिज,परळ 😠
#@*&%√¢£
*&%₹@##@#©®£€😠
(तात्या,  भाऊ, अलबत्या-गलबत्या  धमासान सुरु )

आपण इथे थांबणार आहोत कारण ज्या 'मान्यवरांसाठी'  हे भांडत आहेत ते कार्यालयात पोहोचले आहेत.
 एका छोट्या विश्रांती नंतर आपण ते मान्यवर ' सलबत्या ' यांच्याशी  बोलणार आहोत.

परत एकदा सगळ्यांचे स्वागत . ज्यांनी आताच टीव्ही लावला आहे त्यांच्यासाठी . इथून पुढे ४८ तास  निकालाचे "महाकव्हरेज" तुम्ही फक्त आणि फक्त इथेच पाहू शकणार आहात.  ब्रेकवर जाण्यापूर्वी मान्यवर ' सलबत्या " हे रहदारीतून वाट काढत इथे पोचले आहेत. त्यावरूनाही चर्चा झाली. आता आपण सरळ त्यांना प्रश्न विचारू ,

सलबत्या सर , तुमचे या महाचर्चेत स्वागत.

नमस्कार. 🙏🏻

नक्की कसा झाला तुमचा प्रवास. हे आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचे आहे

नाही म्हणजे छान झाला . ठाण्यात मी  प्रायव्हेट टॅक्सी बुक केली  आणि आलो .🤪

मग तुम्ही कळवलेले की  ट्रॅफीेक जाम मध्ये अडकलेले आहात ?

हो ते किंग सर्कल, खोदाद सर्कल कडून पुढे परळला जाताना बहुतेक मेट्रोचे काम असल्याने . . ..

तेच मला म्हणायचे आहे
मुंबईकरांना कशाला पाहिजे मेट्रो . आधी लोकल सेवा सुधारा, रेल्वे ब्रिज डागडुजी करा 😠
( मग सुरु सगळे )
#@#&-+&%₹#@€£😠
#@#&-+&%₹#@€

मंडळी इथे  थोडं थाबू कारण ज्या ' प्रभादेवी ' वरून हे सगळं सुरु झालं तेथूनच एक  ब्रेकींग न्यूज येत आहे . आमचे प्रभादेवीचे प्रतिनिधी ' देव काणे ' तिथे आहेत.

देव , मला तुम्हाला विचारायचे आहे . काय बातमी आहे तुमच्याकडे ?
देव , माझा आवाज तुमच्यापर्यत पोचतोय का ? देव ? देव ?

होय  ' अमुक  - तमुक ' मला तुमचं बोलणं ऐकू येतंय.

बातमी काय आहे .?

' नैऋत्य - ईशान्य मुंबई  मतदार संघातील ' अपक्ष ' उमेदवार   प्रभादेवीच्या ' सिद्धिविनायक मंदिरात  दर्शनासाठी पोचले आहेत .

यावेळची सगळ्यात मोठी बातमी तुम्ही टीव्ही स्क्रीनवर पहात आहात.
अपक्ष उमेदवार   मंदिरात दर्शनाला  .
सगळ्यात मोठी बातमी. सर्व प्रथम आम्ही दाखवत आहोत
"अपक्ष उमेदवार   मंदिरात दर्शनाला "

देव, तुझे काही  त्यांच्याशी बोलणे झाले का ? काही माहिती ? ते का गेलेले ? विजयासाठी मागणी त्यांनी  सिध्दिविनायका कडे केली का ?

होय , अमुक - तमुक ,  हे अपक्ष  इथेच आहेत. 
नमस्कार ? तुम्ही देवाकडे काय मागितले ? विजय ?
तुमचे देवळात यायचे प्रयोजन काय ?

त्याचे काय आहे , उद्या निवडणुकीचा निकाल लागेल. मी विजयी होईन की नाही त्या परमेश्वरालाच माहीत. पण  तुम्हाला माहीत आहे आज २२ मे. आज ' संकष्टी चतुर्थी '🌷 लोकसभेचा अपक्ष उमेदवार म्हणून  मला डायरेक्ट
 गाभा-यात प्रवेश मिळाला.
उद्या हरलो तर पुढच्या संकष्टीला लाईन लावावी लागेल . म्हणून म्हणलं आजच दर्शन घेऊ.

धन्यावाद आपण आम्हाला  प्रतिक्रिया दिलीत. कॅमेरामन 'क्लिक क्लिक' सह मी 'ढिशॅंव' 'एकच माझा'.

धन्यवाद देव , तुम्ही तिथेच थांबा आणि कोणकोण उमेदवार येतात याचे अपडेट्स आमच्यापर्यंत पोहोचवा.

 भाऊ,  मला  तुम्हाला एक महत्वाचा प्रश्ण विचारायचा आहे, यात तुम्हाला श्रद्धा, अंधश्रध्दा, जोतिष , भविष्य वगैरे जाणवतं?  काय सांगावस वाटतं ?

भाऊं च्या आधी मी बोलतो. पुरोगामी महाराष्ट्रात हे सगळं  😠👆🏻

तात्या प्रश्न मला विचारलाय , मध्ये बोलू नका 😠

अलबत्या तुम्ही थांबा , मी शेवटी तुमच्याकडे येणार आहे

गलबत्या  तुम्हालाही मी वेळ देणार आहे
सलबत्या, एक मिनिट , एक मिनिट

बाबा, हा "व्हाटसप" वर मेसेज बघितलात ? सरकारने सर्व न्यूज चॅनेलवर दोन दिवसासाठी बंदी आणली आहे .
 निवडणूक निकाल फक्त सरकारी वाहिनीवर  रात्री ९ वाचता पाहता येतील.

काय सांगतोस ? अरे  असे पण "  अच्छे दिन आले " तर  ???? 😊


📝अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com
poetrymazi.blogspot.in
विसंगती सदा मिळो.....

Sunday, March 24, 2019

जाऊनी पक्षात सा-या


आज रंगपंचमी यानिमित्याने सर्वाना शुभेच्छा . 'रंग'  म्हणले की सुरेश भटांचे  एक गाणं सर्वाना आठवते  " रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा "

रंगपंचमी आणि इलेक्शनच्या पार्शवभूमीवर ' भटांचे'  हे गाणे नव्या व्हर्जन मध्ये

 ' *वाईट नका वाटून घेऊ  रंगपंचमी आहे*' 🌈

चाल : " *रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा* "
जाऊनी पक्षात सा-या पक्ष माझा वेगळा
गुंतुनी हप्त्यात सा-या 'हात' माझा मोकळा

राहती माझ्यासवे हे कार्यकर्ते मित्रापरी
हे  पैशाचे सुख ज्याला, लागला माझा लळा

आज सकाळी का कळेना मी 'पळाया' लागलो
अन जिथे  आयुष्य गेले, कापला माझा गळा

दावंती 'आदर्श' तेथे, पाळती  खोट्या दिशा
सोडणारा' गद्दार' अन राहणारा 'आंधळा'

इलेक्शनच्या मध्यभागी हिंडणारा नेता मी
माझीयासाठी हा माझा जगण्याचा सोहळा

 📝 अमोल केळकर
विसंगती सदा मिळो ....
poetrymazi.blogspot.in

२५/३/१९
रंगपंचमी

Thursday, March 21, 2019

न्यूज पाहून, सुचले सारे


धुळवड स्पेशल 🥶🌈💥

हरघडी ' ब्रेकींग न्यूज ' पाहून तात्काळ 'टुकार' विडंबनाच्या जिलब्या पाडणा-या सर्व 'सुमार' 'कविंना' समर्पित 😉🤭

🔥🗣 *बूरा न मानो*....💥
--------------------------------------------
( मूळ गाणे: शब्दावाचून कळले सारे, शब्दांच्या पलिकडले)

'न्यूज'पाहून सुचले सारे, 'टुकार'च्या पलिकडले
प्रथम कडवे रचले आणिक लिहू नये ते लिहिले

अर्थ नवा काव्यास मिळाला
'बूट' जूना पण गाल सुजला
त्या दिवशी का प्रथमच माझे 'विडंबन' अडखळले

जुळवितो 'यमकांना' रात्री
लक्ष विचार सुचतील खात्री
'विसंगतीत' या विश्वाच्या, रहस्य मज उलगडले

न्यूज'पाहून सुचले सारे, 'टुकार'च्या पलिकडले
प्रथम कडवे रचले आणिक लिहू नये ते लहिले
-------------------------------------------
मुळ गाणे:-

शब्दावाचुन कळले सारे,, शब्दांच्या पलिकडले
प्रथम तुला पाहियले आणिक
घडू नये ते घडले

अर्थ नवा गीतास मिळाला
छंद नवा अन् ताल निराळा
त्या दिवशी का प्रथमच माझे
सूर सांग अवघडले

शब्दावाचुन कळले सारे,, शब्दांच्या पलिकडले-

आठवते पुनवेच्या रात्री
लक्ष दीप विरघळले गात्री
मिठीत तुझिया  या विश्वाचे
रहस्य मज उलगडले

शब्दावाचुन कळले सारे,, शब्दांच्या पलिकडले
-------------------------------------------
"विसंगती सदा मिळो,  टुकार विडंबन कानी पडो"
www.poetrymazi.blogspot.in

📝२१/०३/१९
अमोल केळकर

Wednesday, March 20, 2019

चला मुलांनो आज शिकून या.


धुळवड स्पेशल 📝
(२१/३/१९)

प्रिय काॅग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील वडीलधारी मंडळींनो, मुलांना शिस्त/ संस्कार लावायचे असतील तर सरळ 'भाजपात' न पाठवता 'संघात' पाठवा.🙏🏻🤷🏼‍♂

आमच्या निष्ठावान आपटे,गोखले,गोगटे, कलकर्णी ,जोशी, खाडीलकर, लेले,  यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? ?🤨🙊
----------------------------------------------------
(चाल: चला मुलांनो, आज पाहू या शाळा चांदोबा गुरूजींची)

या वा-याच्या बसुनी 'ईमानी',सहल करुन या पक्षाची
जावा मुलांनो, जरा शिकून या पध्दत भाजपा पार्टीची 🌷

आली इलेक्शन जमले नेते,निवडणुकीच्या रिंगणात
महा(जन) गुरुजी तर दिसती कसल्या मोठ्या चिंतेत
बघुनी पोरे ती करिती चळवळ आपुल्या इवल्या हातांची✋🏻
जावा मुलांनो, जरा शिकून या पध्दत भाजपा पार्टीची🌷

द्वितियेपासून रोजच येती सुपुत्र यांचे पार्टीत
मुले चांगली रमती आणिक सगळे आपुल्या मस्तीत
कधी स्टेशनातून सुटते 'रेल्वे' ओढ लागूनी 'घडीची' ⏰🚂
जावा मुलांनो, जरा शिकून या पध्दत भाजपा पार्टीची 🌷

कुणी बेताचे ओठ हालवूनी, भाषणास वेडावित असे
रागाने मग 'मावळ' प्रांत गोरामोरा होत असे
बघुनी सारे हसता हसता बनते कविता 'टुकारची' 😉
जावा मुलांनो, जरा शिकून या पध्दत भाजपा पार्टीची 🌷

🌷✋🏻⏰🚂🏹

रंगूनी रंगात सा-या रंग माझा वेगळा 🌈🥶

अमोल केळकर

Sunday, March 17, 2019

सोशल मिडीयावर व्यक्त होताना


सोशल मीडियावर व्यक्त होताना :- 📝
( तुषार पुरवणी- १७/३/१९)

मला आठवतंय  शाळेत असताना मराठीच्या परीक्षेला  हमखास एक निबंध यायचा 
 ' मृत्यू  शाप की वरदान '   किंवा  ' विज्ञान शाप कि वरदान'. आता सध्या  कुठल्या प्रकारचे  निबंध  येतात माहीत नाही पण  सध्याची परिस्थिती पाहता
 ' सोशल मिडीया -  शाप की वरदान '  असा निबंध  एक दिवस मराठीच्या पेपरात आला तर आश्चर्य वाटायला नको.  

साधारण ९० च्या दशकात  म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो  तेव्हा  मीडिया म्हणजे  वृत्तपत्रे , दुरदर्शनवर ठराविक वेळे पुरते लागणारी एकच वाहिनी  ते सध्याचे २४ x ७  अखंड पणे  ' ब्रेकींग न्यूज '  बातमीचा रतीब  घालणा-या असंख्य वाहिन्या  होण्याइतपत  "मीडियाचे सोशल होणे " हा काळाचा महिमाच म्हणावा नाही का ? . 

सगळ्यात पहिला बातमी कोण देतो याची चढाओढ , सर्वात आधी, जणू काळाच्या ही पुढे आम्ही आहोत असे स्वत:ला समजणा-या   वाहिन्या  हे माझ्या मते  समाज माध्यमात तेढी पसरवण्यास कारणीभूत ठरणारे पहिले विषाणू.  कारण बातमीतील  
सत्यता - असत्यता न पाहता सर्वात आधी बातमी ( मग ती  खरी खोटी कशी का असेना  ) देण्यातच ते धन्यता मानत .अर्थात  याला अपवाद होते/ आहेत पण मर्यादित स्वरूपात. 
तरी  पण काही वर्षांपर्यत  परिस्थिती  जरा बरी होती असे म्हणावे लागेल कारण बातम्या बघण्यासाठी का होईना घरात  इडियट बॉक्स समोर बसावे लागायचे. पण आता आधुनिक तंत्रज्ञानाने जेव्हा या सगळ्या बातम्या भ्रमणध्वनीवरून  
(मोबाईलवरुन )  क्षणात अंगा खाद्यावर  खेळायला लागल्या  तेव्हा परिस्थिती  बदलायला लागली. वेगवेगळे अॅप्लिकेशन मुख्यता ' फेसबुक '   एकेकाळी संगणकावर वापरावे लागायचे किंवा संदेश पाठवण्यासाठी  मुख्यतः ईमेल  याचा वापर व्हायचा.  आता आधुनिक भ्रमणध्वनी द्वारे २४ x ७  सर्व गोष्टी ( माणसे, बातम्या आणि अफवा ) खूपच जवळ आल्या आणि एक अपडेटेड सोशल विषाणू  हळूहळू तयार झाला . 

फेसबुकच्या मदतीला ट्विटर, व्हाट्सअप, इंस्टाग्राम  ही बहीण भावंडे आली .
 दुरावलेले मित्र , लांब राहणारे नातेवाईक  याची भेट घालून द्यायला यांनी मोठा पुढाकार घेतला. नवी नवीन  सोई -सुविधा त्यात येऊ लागल्या . बालपणीच्या शिशु विकास मंदिर पासून उच्च शिक्षणाचे ग्रुप , नातेवाईक, सम वयस्क , सम विचारी असे असंख्य ग्रुप तयार होऊ लागले. सुरवातीचे ' सुप्रभात  - शुभ रात्री - वाढदिवसाचे मेसेज'   याचे नाविन्य कमी होत गेले आणि मग सोशल मिडीयाचा हा विषाणू आपले रंग दाखवू लागला. याचा खुबीने उपयोग करून घेतला  समाजविघातक घटकांनी. दुर्दैवाने बरेचजण याला बळी पडले. बघता बघता रौद्र रूप धारण केलेल्या या राक्षसाने  मग मागे वळूनच पाहिले नाही. 

आपल्याला हवी ती  बातमी  ' ब्रेकींग न्यूज'  च्या नावे  एका ग्रुप वर टाकून क्षणार्धात तिला साता समुद्रापार पोचवायचे कार्य या राक्षसाने इमाने इतबारे  पार पाडले.   

अनेक ठिकाणी निखळ मैत्रीची जी  जागा होती ती द्वेषाने घेतली,शब्दाला शब्द वाढले, धर्म-जात -प्रांत- भाषा - देश - पक्ष यानुसार आवडी निवडी ठरू लागल्या , प्रेमळ शब्दाच्या जागी विषारी डंख पसरू लागले आणि शेवटी  याच सोशल मीडियाला  
 'आनंद पसरवा , अफवा नको'  अशी जहिरात करावी लागली . 

त्यामुळे आज   प्रत्येकाने सोशल मीडियावर व्यक्त करताना काही आचारसंहिता  अमलात आणणे आवश्यक वाटते 

१) आपण एखादा मेसेज पुढे ढकलताना त्यात काही आक्षेपार्ह गोष्टी नाहीत ना, काही वाद - विवादाचे मुद्दे नाहीत नाही याचा विचार अवश्य करावा.  
२) ' ब्रेकींग न्यूज ' च्या नावाखाली सरसकट बातम्या पुढे ढकलू नयेत. त्याची सत्यता तपासावी . सत्यता नाही समजली तर गप्प बसेल तो सोशल माणूस कसला? या अशा प्रकारानेच अनेकजणांनी वेळेच्या आधीच 'हे राम' म्हणले.
३) एखाद्याने एखादा मांडलेला मुद्दा चुकीचा वाटला तर सभ्य पणे  निर्दशनास आणून द्यावे, आपले मत थोडक्यात मांडावे , मीच खरे असे म्हणू नये
कालांतराने ते मुद्दे कालबाह्य होतात पण आपण या मुद्यापायी एखाद्याशी कायमचे वैर पत्करून बसतो.
४) सारासार विचार , चांगल्या गोष्टीचे कौतुक , मैत्रीपूर्ण संवाद , वेळ प्रसंगी माघार या कृतीमधूनच यामाध्यमाद्वारे जी  एकमेकांच्यात जवळीक निर्माण झालेली आहे  ती कायम राहाण्यास मदत होईल 
५) आपण जरी चांगले असलो तरी  प्रत्येक व्यक्तीचा ( अपरिचित )  हेतू समजू शकत नसल्याने वयक्तिक  फोटो , टीका टिप्पणी , प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक माहिती सोशल मिडीयावर देणे टाळावे किंवा आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंट वर काही विशिष्ठ सेटींग करून ठेवावे जेणेकरून कुणी आपल्या माहितीचा दुरुपयोग करणार नाही आणि ती माहिती फक्त ठराविक, विश्वासू व्यक्तीनाच कळू शकेल. 

मर्यादेत स्वरूपात सोशल मीडियावर व्यक्त होणे , काही चागल्या गोष्टींचा स्वीकार करणे यासारख्या लसी वेळीच टोचल्या नाहीत  तर हा विषाणू समाजमनाचा नाश केल्याशिवाय रहाणार नाही आणि याला आपण  सर्वचजण जबाबदार राहू 
हे कळकळीचे सांगणे.🙏🏻

📝अमोल केळकर


Tuesday, March 12, 2019

जा मुला जा..


गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का?
जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा.

म्हणणा-या वडिलांना आता असंही म्हणावे लागतयं 😅

राष्ट्र- वादी हा नगरात उभा या
जा मुला जा दिल्या पक्षी तू सुखी रहा 🌷

कडकडूनी तू वाद घालता बाळा
कार्यकर्ते आले, झाले करवीत चाळा
'आठवले'  सारे, सारे गहिवरले त्या मळा
'माढा' 'मावळूनी' तुला सांगती जा

जा मुला जा 🌷

दारात उभी राहिली युतीची जोडी
बघ मंत्रीपद ठाकले आरक्षून गाडी
लागू दे तुज ला कमलपुष्पची गोडी
विरोधी नेतेपद मला ठेऊनी जा

जा मुला जा दिल्या पक्षी तू सुखी रहा 🌷

📝अमोल

१२/३/१९

Friday, March 1, 2019

अभिनंदन करूनी बोला..


शुभ शनिवार 🙏🏻

🚀🚀🚀🚀🚀🚀

भारताच्या सूता,  तूला नमोंच वरदान
अभिनंदन करूनी बोला, बोला जय जय वर्थमान

दिव्य तुझी देश भक्ती, भव्य तुझी काया
लागलीच गेलास तू,  शत्रूला धराया 🚀
हादरली ही पाकडी, थरथरला इम्रानखान
अभिनंदन करूनी बोला, बोला जय जय वर्थमान

शत्रूला धरण्यासाठी घेतलास धोका
तिथे देशभक्तीचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे, परि आनंदी हिंदुस्थान
अभिनंदन करूनी बोला, बोला जय जय वर्थमान

आले किती ,गेले किती, संपले भरारा
हिंदुस्थान नावाचा रे अजूनी दरारा 🚩
सुखरूप आलास घरी, आतंकवादी हैराण

अभिनंदन करूनी बोला, बोला जय जय वर्थमान

📝२/३/१९ 🚀🙏🏻
poetrymazi.blogspot.in

Tuesday, January 8, 2019

हे ल्मेट मजला लागते


शिरस्त्राण '  हा  सध्या  पुणेकरांचा अत्यंत  जिव्हाळ्याचा विषय. परवा पुण्यात गेलो असताना एका मित्राला दोन चाकी गाडी मागितली,  त्याने दिली आणि   ' शिरस्त्राण '  देण्याची मागणी केली असता म्हणाला 👇🏻

(चाल :  हे  वेड मजला लागले , तुजलाही  ते  लागेल का ? )

हे ल्मेट मजला लागते , तुजलाही ते चालेल का ?
माझ्या डोक्यातील ही ' उवा ' कोणी तुला दावेल का ?

हे ल्मेट मजला लागते. . . . .

मी घालतो  स्वप्नी सुद्धा , मी घालतो जागेपणी
जो मी निषेध करितो, सत्यात तो येईल का ?

हे ल्मेट मजला लागते.  . . .

ही वाट घटकेची जरी , 'घामा'ळ मी पण जाहलो
जे वाचले माझे ' मनी' , पार्टित  ते संपेल का ?

हे ल्मेट मजला लागते.  . . .

माझे "मनोगत" मी तुला केले निवेदन आज, हे
सर्वस्व हे 'हेल्मेट' माझे,डोस्क्यात तुझ्या शिरेल का?

हे ल्मेट मजला लागते. . . . .
🛵  -------------------->  🚲


अमोल केळकर
poetrymazi.blogspot.in
a.kelkar9@gmail.com

 📝 पौष शु ३

Monday, January 7, 2019

क्षणभर उघड नयन देवा


आमच्या 
' अरूणा मावशी ' साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि 
' नयनतारा जी '  ✨उद्घाटक
 ( * बहुतेक असाव्यात)  अशा ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाला  आमच्या  अगावू शुभेच्छा 💐

क्षण भर उघड 'नयन' देवा

करावया ही 'साहित्य ' पूजा
साहित्यनगरी जाऊन आता
' निमंत्रणाचा' हा नजराणा स्वीकारून घ्यावा 😉

क्षण भर उघड 'नयन' देवा

निरोप जातो न येण्याचा
निषेध पसरला बहिष्काराचा
' माफी पत्र' जालावर ठेवीले, प्रभू माझा यावा

क्षण भर उघड 'नयन' देवा

भांडण नाही , नाही शिवी
'यवतमाळ' ना, कुणाच्या गावी
लेखणीतले शब्द ही करिती, अखेरचा धावा.

क्षण भर उघड 'नयन' देवा

साहित्य संमेलनाला शुभेच्छा 💐

📝 टुकार साहित्यिक
८/१/१९
poetrymazi.blogspot.in

#साहित्य संमेलन

Saturday, January 5, 2019

पंडीत संजीव अभ्यंकर


*मर्म बंधातली ठेव ही* :- 🎹🎼🎧🎤

प्रिय संजू,

होय होय तूच "पंडीत संजीव अभ्यंकर" .
संजीव दादा?  अहं! मजा नाही यात,  भले ३-४ वर्षानी मोठा असलास तरी कधी संजू दादा म्हणल्याचं आठवत नाही बुवा.
 आपल्यासाठी तर तू कायम
 ' संजूच'
तर तुला मुंबईत आज ( ६ जानेवारी २०१९ ला) किशोरीताई आमोणकर यांच्या नावाने दिला  जाणारा
" *गानसरस्वती पुरस्कार २०१८" मिळतोय.  याबद्दल सर्वप्रथम*
 *मन: पुर्वक अभिनंदन आणि* *पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा*  💐💐

तू म्हणशील अरे इतके पुरस्कार मिळाले तेंव्हा कुठं गायब होतास आणि आज एकदम शुभेच्छा वगैरे?
त्याच काय आहे संजू म्हणजे आपली ऐकीव माहिती हं की अगदी तरुण वयात गायकाचा ' आवाज फुटतो ' तसंच लेखकाचे शब्द ही असेच केंव्हा तरी अचानक उमटू लागतात. तसे आमचे शब्द आत्ता कुठे चाळीशी ओलांडल्यावर उमटू लागलेत. तेंव्हा उशिराने का होईना लिहू म्हणले.
तुझ्या गाण्या इतके गोड नाही लिहिता यायचे पण हा एक छोटासा प्रयत्न. बर नुसते शुभेच्छा लिहूनही उपयोग नाही थोडंसं सविस्तर नाही लिहिले  नाही तर राणी मावशीचा मुलगा कसा शोभणार? 😀

असो. तर लहानपणी  दिवाळीत,  मे महिन्याच्या सुट्टीत पुण्याला आलो की बाजीराव रोड वर भाऊ अजोबांकडे आणि नंतर
ब-याचदा मुक्कामाला शनिपाराजवळ प्रतिभा मावशीकडे जायचे हे बहुतांशी वेळेला ठरलेले असायचे.  त्यावेळेला डेक्कन जिमखाना हे लांब वाटत असल्याने शोभा मावशीकडे म्हणजेच  तुमच्याकडे येणे फारसे व्हायचे नाही. तरी पण अधून मधून तुमच्याकडे येऊन केलेला दंगा,  नातेवाईकांच्या लग्न कार्य इतर समारंभा निमित्य  झालेल्या भेटी , तसेच दादरला हिंदू काॅलनीत दिलीप मामा कडे तू आणि सुनंदने युती करुन मला एकटे पाडणे वगैरे  काही आठवणी मनात जपून ठेवल्या आहेतच.👍🏻

संजू गाणं शिकतोय , संजू जसराज जी यांच्या कडे शिकायला जातोय, संजूचा इकडे कार्यक्रम झाला,  पंडीत जसराज जींचा दूरदर्शन वर कार्यक्रम आहे मागे साथीला संजू आहे, संजूवर आज एका पेपरात / मासिकात / दिवाळी अंकात लेख लिहून आलाय , संजूला अमुक पुरस्कार जाहीर झाला आहे, संजूचा नवीन अल्बम आला आहे, संजूची ही सिडी १ नंबर आहे,  संजूचे परदेशात कार्यक्रम आहेत,  आज अकाशवाणी संगीत मोहोत्सवात संजू आहे , ते  अगदी काही दिवसांपुर्वी यंदाच्या दिवाळी पहाट IBN लोकमतवर संजूचे दिसणे हा प्रवास *निव्वळ थक्क करणारा*.
आतापर्यंत तुला किती पुरस्कार मिळाले आहेत हे तुलाही कदाचित सांगता येणार नाही पण आम्ही सगळेच वाट बघतोय ती  भारत सरकार तर्फे देण्यात येणा-या  *पद्म पुरस्काराची* 🥇🌷
अर्थात सरकार देईल न देईल पण तुझ्या चाहत्यांनी तो तुला केंव्हाच दिलाय 💐

या शुभेच्छा लेखाच्या खाली एक तुझ्याच संग्रहित चित्रांचा तुझ्याच एका गाण्यासह एक व्हिडिओ पाठवलाय. तो पाहून वाटतं की किती मोठ्या प्रसिद्ध व्यक्तींना संजू भेटलाय. मग महाराष्ट्राचे लाडके *पु.ल* असू  देत किंवा *लता दिदी*, *भीमसेन जोशी*, *नौशाद किंवा हिराबाई बडोदेकर*.  पण हे यश काही सहजासहजी नक्कीच मिळालेले नाही. संगीताचे " *ध्यान करु पाहता, भान हरपले*" ही भावना असल्याशिवाय केवळ हे अशक्य. यात तुझा जसराज जी यांचा बरोबरचा फोटो द्रोणाचार्य - अर्जुन यांची आठवण करुन देणारा. आणखी एका फोटोत शोभा मावशी तुला तंबो-यावर साथ देत आहे. क्या बात है!  हा अल्बम म्हणजे जणू मर्मबंधातली ठेवच तुझ्यासाठी.  तशीच एक *मर्मबंधातली ठेव* माझ्याकडे ही आहे.

त्यासाठी आपल्याला १९८३ पर्यत मागे जावे लागेल.

स्थळ : माधवनगर, सांगली
जून महिन्यातील पहिला आठवडा. १३५ गुरुवार पेठ, माधवनगर येथे चिरंजीव अमोल उर्फ केदार केळकर याच्या व्रतबंधनाची जोरदार तयारी सुरु होती. सर्व परिचित, नातेवाईक यांना पत्रिका पोहोचल्या होत्या. माधवनगर परिसरातील, काॅटन मिल मधील, परिचितांसाठी , नातेवाईकांसाठीवेग वेगळ्या दिवशी जेवण ठरले होते.
बुधवार पेठेतील ' जाखोटीया मंगल कार्यालय ' दोन - तीन दिवसासाठी बुक झाले होते. ५ जून १९८३ ला मुंज. बटु अमोलने आपल्या आईला विचारले कोण कोण येणार आहेत मुंजीला? आईने सांगितले अरे सगळे येणार आहेत. सगळ्या आत्या, रघू मामा, रजनी मावशी, शोभा, प्रतिभा मावशी,  आनंद,  संजू इ.इ
आदल्या दिवसा पासून कार्यालय घेतल्याने आणि लग्नासारखे काही धार्मिक कार्यक्रम आदल्या दिवशी नसल्याने ४ जून १९८३ ला संध्याकाळी त्यावेळी शाळेत शिकणा-या 'पंडीत संजीव अभ्यंकरला' गाणे गायची फर्माइश झाली. तबला-पेटीच्या  साथीला माधवनगरचे स्थानिक कलाकार मिळाले आणि एक अत्यंत सुरेल मैफल संपन्न झाली.
' *नारायणा रमा रमणा मधू सुदना मनमोहना, अबीर गुलाल उधळीत रंग* ' ही काही गाणी माझ्या मनात इतक्या वर्षानंतरही अजून घर करुन आहेत.

संजू, कदाचित ही गोष्ट तुला आठवतही नसेल पण माझ्या आयुष्यातील ही एक अतीशय दुर्मिळ आठवण म्हणूनच माझी मर्मबंधातली ठेव. 😊

खुप लिहिले,  एव्हान तू ही हे वाचून बोअर झाला असशील. आता हे तुला वाचायला मिळालं असेल असं गृहीत धरतो कारण प्रतिभा मावशी म्हणालीय हा लेख तुला पाठवेल म्हणून.

तर संजू , २०१९ मधे शक्य झाल्यास पुण्यात एकदा भेटू.
यावर्षी मी पुण्यात येताना एक डायरी नेहमी बरोबर ठेवेन.जेंव्हा आपण भेटू त्या तारखेच्या पानावर एक मस्त तुझी सही घ्यायची आणि *कलियुगातील प्रथेप्रमाणे एक सेल्फी घेऊन तो सगळ्यांना दाखवत सुटायचे*😁 असा मानस आहे. आणि बर का माझ्या शाळेतील काही मित्र अनिल महाजन,  नियमीत सवाई महोत्सवास भेट देणारा एक मित्र प्रशांत कुलकर्णी हे हीे सगळे तुझे चाहते आहेत. जेंव्हा केंव्हा तुझा विषय निघायचा तेंव्हा मी अभिमानाने  सांगायचो संजू माझा भाऊ आहे म्हणून. तेंव्हा जमल्यास त्यांना ही घेऊन येईन भेटायला कधीतरी

पण जेंव्हा केंव्हा भेटू तेंव्हा फक्त एकच गोष्ट जाणवेल जे तुझ्या एका फोटोत वाचायला मिळाली 👇🏻
*Only his "looks"have changed* 👍🏻

*आज या पत्रलेखनाच्या निमित्ताने का होईना परत संपर्क झाला. परत एकदा तुला खुप खुप शुभेच्छा* 💐💐💐💐
आणखी एक, एक फक्त एकच सांगणे. ...🙏🏻
सध्या  गाण्याच्या शो मधे  सन्माननीय अपवाद वगळता जे परीक्षक म्हणून येतात त्यांचे नखरे पाहवत नाहीत रे. लवकरच तुझ्यासारखा मनस्वी कलाकार परीक्षक म्हणून मिळण्याचे भाग्य तमाम महाराष्ट्रातील तरुण पिढीला मिळो हीच एक इच्छा.

अमोल केळकर, नवी मुंबई,  बेलापूर
a.kelkar9@gmail.com


Related Posts Plugin for WordPress, Blogger...