नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, July 31, 2021

(ही) बिर्याणी साजूक तुपातली


 *पुणेरी  बिर्याणी*

( प्रासंगिक विडंबन, मनोरंजन : हा हेतू *)


पहिल्या 'टोपाला' भूकेनं साला

काळीज केलंय बाद 🍲

(ही) बिर्याणी साजूक तुपातली

आम्हा 'खाण्याचा' लागलाय नाद 😷


व्हेज का नाॅनव्हेज नको इशारा

मिळू दे आता 'फुकटात' सारा

इथं बि वसुली तिथं बी वसुली

स्टेशनात नको ह्यो वाद


(ही) बिर्याणी साजूक तुपातली

आम्हा 'खाण्याचा' लागलाय नाद ☺️


चुकून जरी हा 'चेकमेट' झाला

खबर लागली 'महाराष्ट्राला'

लागलाय आता तोल सुटाया

'नल्ली निहारिची' ही लाट....


(ही) बिर्याणी साजूक तुपातली

आम्हा 'खाण्याचा' लागलाय नाद ☺️


( मन्थ एन्ड, विडंबन टार्गेट पूर्ण *)  अमोल 📝

३१/०७/२१


#साजुकतूपातील_बिर्याणी

Wednesday, July 28, 2021

पाऊस नक्षत्र आणि आधुनिक म्हणी


 "पाऊस नक्षत्र" या संदर्भात प्रचलित म्हणींची माहिती देणारा एक लेख बराच व्हायरल झालाय. छान माहिती त्यात मांडलीय पण कालानरुप त्यात बदल व्हायला पाहिजे असे वाटते.


आधी आपण मुळ म्हणी एकत्रीत वाचू


रविचा मृग प्रवेश ( ७ जून)  ते रवीचा स्वाती प्रवेश ( २५ आँक्टो) हा साधारण प्रचलित पावसाचा हंगाम. त्यानुसार क्रमाने या प्रचलित म्हणी


पडल्या मिरगा तर टिरीकडे बघा

पडतील आद्रा तर उडतील गडदरा

पडतील पुक ( पुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख

आश्लेषा- मी येते सळासळा, मामाजी तुम्ही पुढिं पळा

पडतील मघा तर चुलीपुढे हगा

पडता हस्ती कोसळतील भिंती

पडतील चित्रा तर भात खाईना कुत्रा

पडतील स्वाती तर मिळतील माणिक मोती


इथे मला पुनर्वसू, पूर्वा फाल्गुनी,उत्तरा फाल्गुनी याबद्दल काही म्हणी त्या लेखात आढळल्या नाहीत. प्रत्यक्षात असतीलही ( अर्थात आपण ती कमी भरून काढूच)


तर मंडळी मृग नक्षत्र लागण्या आधी रोहिणीत येणारा पाऊस हा 'वळवाचा' किंवा त्याला आजकाल मान्सुनपूर्व पाऊस म्हणतात.


रवीचा रोहिणी नक्षत्र कालखंड

( २५ मे ते ६ जून)

आधुनिक म्हण:

" *रोहिणीत काढू छत्री, भोकंबिकं नाहीत ना करु खात्री* " - वळवाच्या/मान्सूनपूर्व पावसाने आगामी पावसाळ्याची चाहूल लागते. छत्र्या, रेनकोट, पावसाळी बूट आठवतात आणि त्यांची वेळेवर डागडुजी, नवीन खरेदी केली जाते


रवीचा मृग नक्षत्र कालखंड ( ७ जून ते २२ जून)

आधुनिक म्हण:

" *मृगाचा कमी दाब, मुंबईकरांना लाभ* " - मान्सून केरळात, प्रवास संथगतीने,  अमुक दिवशी कोकणात/ मुंबई येणार या  बातम्यां बरोबरच बंगालच्या किंवा अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा हमखास तयार होऊन मुंबईकरांची दाणादाण उडवून टाकतो.


रवीचा  आद्रा नक्षत्र कालखंड ( २३ जून ते ५ जुलै)

आधुनिक म्हण: 

*मिठी आदराची, डुबकी कुरल्याची* :- मिठी नदी पात्राची मिठी सैल करुन बाहेर पडते आणी सायन,  कुर्ला भाग डुंबायला लागतो. या काळात म्हैस,  बेडूक, हत्ती वाहन असेल ( दरवर्षी प्रत्येक नक्षत्रात पावसाळी वाहन वेगळे असते)  तर ही मिठी पंचक्रोशीला कवेत घेते.


रवीचा पुनर्वसू नक्षत्र कालखंड ( ६ जूलै ते २० जुलै)

आधुनिक म्हण: 

*"राज्यात दुष्काळ, पुनर्वसनासाठी केंद्राला घाट*"

*राजाचा मजकूर प्रधान सेवकाला पाठ*

मुंबईत पाणी पाणी होत असताना, राज्यभर मात्र दुष्काळाची छाया पसरते, आषाढीला पांडुरंगाला साकडे आणि केंद्राकडे याचना हे सगळं ठरलेलेच.


रवीचा पुष्य नक्षत्र कालखंड (  २१ जुलै ते २ आँगस्ट) 

आधुनिक म्हण:

*"घोडा लागला ( वाहन) पुष्यात, पाऊस आला गुश्श्यात"*

आता माझी सटकली म्हणत पाऊस सगळीकडे उधळतो.


रवीचा आश्लेषा नक्षत्र कालखंड ( ३ आँगस्ट ते १७ आँगस्ट ) 

आधुनिक म्हण:

*"आश्लेषाचा भार धरणाला, नदीकाठचे वाळवंटाच्या वळणाला*"

हीच ती वेळ. धरणे भरून लागतात, पाणी सोडले जाते आणी नदीकाठच्या लोकांना आपला भाग सोडून पाणी नसलेल्या ठिकाणी स्थलांतरित व्हावे लागते.


रवीचा: मघा नक्षत्र कालखंड ( १८ आँगस्ट ते २९ आँगस्ट ) 

आधुनिक म्हण:

*श्रावणात पडेल मघा, लोणावळा- खंडाळा सौंदर्य बघा*

पावसाळी सहली ख-या अर्थाने एन्जाँय करण्याची वेळ


रवीचा: पु.फाल्गुनी ते उत्तरा  फाल्गुनी कालखंड ( ३० आँगस्ट ते २६ सप्टेंबर  ) 

आधुनिक म्हण:

*पडेल फाल्गुनी, राजांचे दर्शन होई घरुनी*

:- गणेशोत्सवाचा कालखंड,  या कालावधीतला पाऊस भक्तांच्या उत्साहावर विरजण घालतो 


रवीचा: हस्त नक्षत्र  कालखंड ( २७ सप्टेंबर ते ९ आँक्टोंबर  )

आधुनिक म्हण:

*पडू दे किंवा नको पडू दे हस्त, खड्ड्यांनी केंव्हाच रस्ता केलाय फस्त*:

:- आपल्या हातात फक्त मलिष्काची गाणी ऐकणे 


रवीचा: चित्रा नक्षत्र  कालखंड ( १० आँक्टोंबर ते  २४ आँक्टोंबर )

आधुनिक म्हण: 

" *माळेत जर अडकली चित्रा, कसा खेळशील गरबा मित्रा* "

घटस्थापनेला पाऊस असेल तर माळेत अडकतो आणि अडचणी वाढवतो.


रवीचा: स्वाती नक्षत्र  कालखंड( २५ आँक्टोंबर ते ६ नोव्हेंबर )

आधुनिक म्हण: 

*पडू नको स्वाती नाहीतर दिवाळीची होईल माती*

:- आजकाल पाऊस पण दिवाळीचे उटणे लावूनच जातो.


साधारण पावसाचे चक्र असेच दिसून येते.

मंडळी, या आधुनिक म्हणी आवडल्या असतील तर. खालील इमेल वर  प्रतिक्रिया नक्की द्या.  


अमोल केळकर 📝

a.Kelkar9@gmail.com

आषाढ कृ. षष्ठी

२९/०७/२१


#पाऊस_नक्षत्र

#आधुनिक_मनोरंजन

पूर ते महापूर


 पूर ते महापूर


आमच्या चुलत काकांचे सांगलीला नदीकाठी ( विष्णू घाट)घर आहे.


कृष्णेला पूर आला की  काका आणि इतर भावंडांबरोबर मागे डबा ( डालडाचा सिल केलेला) लावून माई घाट ते विष्णू घाट पोहत येण्याचे एक 'शास्त्र' केले जायचे ( सांगलीच्या प्रसिध्द आयर्विन पूलाच्या एक बाजूला माई घाट तर दुस-या बाजूला सरकारी घाट मग पुढे विष्णू घाट). पात्रातले भोवरे, पुलावरून उड्या मारणारे, अट्टल पोहणारे हे सगळं बघत पोहायला मजा यायची. 



पोहायचे बरेसचे अंतर हे नदी पात्रातील पाण्याच्या वेगाने आपोआप भरून निघायचे  ( हात पाय मारून आपण पट्टीचे पोहणारे असा उगाच हावभाव दाखवणा-यांच्यात मी पण असायचो 😛)


मग एखाद्या दिवशी काका मार्ग बदलायचे म्हणजे Across नदीला छेदून विष्णू घाट ते समोरचा सांगलवाडीचा घाट आणि परत. इथे मात्र ब-यापैकी....  कस लागायचा


मात्र मागे डबा आणि सोबत काका त्यामुळे फारसं काळजी करायचं काम नसायचं. ( तरीपण ' काका मला वाचवा' असं एकदा केंव्हातरी गटांगळ्या खाताना ओरडलेलं अंधुक स्मरतय 🙈)


तसं पोहण्याचा 'करेक्ट कार्यक्रम ' आम्ही शिकलो ते माधवनगर या खेडे गावात. सांगली पासून अगदी जवळ, आता ओळख सांगायची झाली तर क्रिकेटर स्मृती मानधनाचे गाव. तिथं  उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही विहिरीत पोहायला आमच्या भावाकडून शिकलो. दर उन्हाळ्यात हा कार्यक्रम फिक्स असायचा. चेंज म्हणून फारतर विहिर बदलली जायची.


अरुंद , गावाकडच्या खडबडीत रस्त्यावरून गाडी चालवणारा अचानक एकदिवस एकस्प्रेस हायवेला आला तर त्याची जी अवस्था होईल तशी अवस्था आमची कृष्णेत उतरल्यावर व्हायची


आणखी एक आठवण म्हणजे या काकांची स्वत: ची लहान ' नाव / बोट' होती. त्यातून ही अनेकदा फेरी मारायचो.  मोठा भाऊ हरिपूर पर्यत ( कृष्णा - वारणा संगम)   जाऊन नदीतून वाहत येणारे नारळ वगैरे आणायचा. एकंदर त्याकाळी कृष्णेचा 'पूर' ही पर्वणी असायची


पूराचा - 'महा' पूर काय झाला

शास्त्र/ गणित सगळंच बिघडलं


जवळजवळ १०- ११ महिने ' संथ वाहणारी कृष्णा-माई ' एखाद्या महिन्यात रुद्र रुप धारण करते ते काठावरची तिची मुले सुधारावीत म्हणून ? का दुसरा कुठला राग काढते तेच कळेना झालंय ? 


( कृष्णेचे पाणी पचवलेला)  अमोल 📝

२८.०७.२१


( चित्र: विष्णू घाट, सांगली )

Tuesday, July 20, 2021

' मॅपवाल्या बाई '




शाळेत असताना भूगोल विषयात मॅप / नकाशा काढायचा  एखादा प्रश्न असायचा. ब-यापैकी सोडवला जायचा. पूर्वेकडे मद्रास आणि कोलकत्ता यात जागेची अदलाबदल तसेच चंदीगड / दिल्ली नक्की कोण वर कोण खाली अशा किरकोळ चुका व्हायच्या, एखादं दुसरा मार्क गेला तरी फारसं काही वाटायचं नाही.


अभ्यासक्रमात शिकवल्या जाणा-या विषयांचा प्रत्यक्ष जीवनात फारसा उपयोग नसतो हे माझे मत आता हळूहळू बदलू लागलं आहे जेंव्हापासून मी ' गुगल मॅप' वापरू लागलो. पुढे कुठे आपल्याला नकाशा वापरायला लागणार आहे या विचाराला मस्त तडा गेला,  त्यातील गणिताचे  महत्व ही तेंव्हाच कळले जेंव्हा डावीकडे  २० मिटरवर गल्लीत वळायला बाईंनी सांगितले आणि आम्ही पुढे ३० मिटरवरच्या गल्लीत वळतो. अशावेळी जर तुम्ही बायकोच्या नातेवाईकांकडे जात असाल तर मग .....


तर मंडळी, आजकाल अनेक संस्था,  इन्स्टिट्यूट, सेवा देणा-या कंपन्या स्वतः मधे अधिक चांगला बदल घडवून आणण्यासाठी फिडबँक घेतात, लोकांचे/ ग्राहकांचे मत विचारतात. इलेक्टाॅनिक गँझेटस ही अपग्रेड करत  असतात. आमच्या शाळेतल्या सरांनी मात्र असा फिडबँक कधी घेतल्याचे स्मरत नाही. घेतला नाही तेच बरं झालं कारण आमच्या फिड- बॅक नंतर परत  शाळेत आमचे कम- बॅक झाले असते असे वाटत नाही. असो 


तर या  जीवन प्रवासात  जेंव्हा गरज पडते तेंव्हा प्रत्यक्ष  रस्त्यावर मार्ग दाखवणा-या "गुगलमॅपवाल्या बाईंना" 'गुरुपोर्णीमेच्या' निमित्याने  काही गोष्टी सुचवाव्यात असे यानिमित्याने वाटले म्हणून लिहिले,

 

गुगल बाई, सादर प्रणाम


अनोळखी ठिकाणी जाताना, ध्येयसिध्दी होईपर्यंत तुम्ही आम्हाला अचूक मार्गदर्शन करता. एकवेळी आम्ही कंटाळतो पण तुम्ही न कंटाळता your destination on right side असं सांगूनच थांबता, याबद्दल तुमचे अनेक आभार 🙏


पण बाई, या सोबतच्या प्रवासात शक्य झाले तर

१) आम्हाला मराठीत मार्गदर्शन करा, 

२) नुसतं डाव/ उजव/ सरळ पेक्षा पुढच्या चौकात एक पानपट्टी दिसेल तिथे उजवी कडे वळा, किंवा २० मीटर वर छेडा जनरल स्टोअर्स च्या बाजूच्या गल्लीत वळा हे जास्त चांगलं समजेल, नाहीतर पुढे जाऊन ५० मिटरवरच्या जोशी गल्लीतच आम्ही वळणार हे नक्की. अशा काही खुणा आम्हाला पुण्य नगरीत सदाशीव  पेठ, प्रभात रोड या ठिकाणी दिल्यास खूप उपयोगी होतील

३) दरवर्षी आषाढी एकादशी नंतर कृपया रस्त्यावर विशेषतः नुकत्याच तयार झालेल्या उड्डाणपूलावर 'खड्डे' नक्की कुठे आहेत हे आवर्जून सांगा

उदा. बेलापूर हून ठाण्याकडे जाताना उरण उड्डाणपूलावर शक्यतो उजव्या बाजूने जाणे, कमी खड्यातून जाल.

नेरुळ उड्डाणपूलावरुन न जाता खालूनच जाणे, थोडावेळ सिग्नलला थांबायला लागले तरी चालेल त्यात फायदा आहे. 

तुर्भे स्टेशनसमोर स्पिड ब्रेकरलाच गेलेला उंच सखल छेद नक्की कशाप्रकारे गेल्यावर गाडीच्या मडगाडला लागणार नाही यावर तर एक यूट्यूब व्हिडिओच बनवा.

 पुढे घणसोलीच्या सगळ्यात मोठ्या उड्डाणपूलावर किती मीटरवर डाव- उजव करायचं आणि कुठल्यावेळी अगदी मधोमध गाडी चालवायची हे ही जमलं तर सांगा


अर्थात जसे जसे  खड्डे update होत राहतील तसे तसे तुम्ही ही जास्त योग्य मार्ग सांगालच यात शंका नाही.


या कालावधीत माणसांच्या शरीरातील रक्त वाहिन्या प्रमाणे लाल भडक मार्ग दिसून तिथे अडकलो तर थोडेसे मनोरंजन म्हणून आपोआप बाजूला छोट्या चौकटीत  'मलिष्का ताईंची' खड्यांवर केलेली गाणी चालू होतील असं काही करता आलं तर बघा.


तूर्त इतकचं, आठवेल तसं लिहिनच


मला खात्री आहे बाई, तुम्ही आमच्या 'भरवश्याला' तडा नाय जाऊ देणार ☺️


गुगल ने दिला मँपरुपी वसा,⤵️

आम्ही वापरू हा, हवा तो तसा 🛣️


📝 अमोल केळकर

आषाढ शु. द्वादशी

२१/०७/२१

Saturday, July 17, 2021

दैवजात सुखे भरता, लोभ हा कुणाचा'


 

श्री श्रीधरजी,


सर्वप्रथम अत्यंत आभारी की मला आपणाशी फोनवर बोलण्याची संधी आपण दिलीत 🙏. ग्रंथयात्रेच्या ३७ व्या भागात अर्चना ताईंनी 'गीतरामायण ' बद्दल माहिती सांगितली. त्यांना हा भाग आवडल्याचे मी कळवले, त्यांनी ती प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवली. रात्री अर्चना ताईंनी मला तुमचा नंबर पाठवून तुमच्याशी बोलायला सांगितले आणि काल आपले बोलणे झाले. एकदम भारी वाटलं. 


 प्रत्यक्षात खूप काही बोलायचे ठरवले होते पण ऐनवेळी जास्त काही सुचले नाही म्हणून मनातले आता लिहून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.


सर्वप्रथम ग्रंथयात्रेत तुम्ही जी माहिती सांगितलीत त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलची आठवण विशेष भावली. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हे गाणे ऐकताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ह्या गाण्यातील


'अयोध्येस हो तू राजा, रंक मी वनीचा'


 ह्या वाक्याचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रत्यक्ष जीवनाशी कसा संबंध लागतो हे क्रांतीकारी रसग्रहण मला फार आवडले.


सुदैवाने माझ्याकडे  बा.भ. बोरकरांचे प्रस्तावना असलेले गीतरामायणाचे छापील  पुस्तक आहे, किंमत २ रु. यावरून एका मराठी मालिकेतील एक वाक्य आठवते,

 "दोन रूपये भी बहुत बडी चिज होती है बाबू " खरंच हा एक अत्यंत अमोल ठेवा आहे असे मी म्हणेन


"गीतरामायण" हे जे चिरंतन काव्य निर्माण झाले त्याचे श्रेय गदिमा आणि बाबूजींचेंच तरीही या दोघांनीही वेळोवेळी असे म्हटले आहे की, हे कार्य त्यांच्याकडून नियतीने/ एका विशेष शक्तीने करवून घेतले याचा उल्लेख आपण ही केलात. 

याबाबत थोडेसे


प्रभू श्रीरामांची कर्क रास, पुष्य नक्षत्र. चंद्र-गुरु कर्केत तर शनी महाराज तुळ या उच्च राशीत . 

ग्रंथयात्रेच्या कार्यक्रमात तुम्ही सांगितले की १ एप्रिल १९५५ ला रामनवमीच्या दिवशी हे गीतरामायण पहिल्यांदा प्रसारित झाले. त्या दिवशीचा ग्रहयोग पाहिला असता त्यादिवशी कर्क रास- पुष्य नक्षत्र आणि तुळेचा शनी असा समांतर ग्रहयोग माझ्या पहाण्यात आला. नक्षत्रात पुष्य नक्षत्र हे सगळ्यात शुभ नक्षत्र मानले जाते. ज्योतिष अभ्यासक म्हणून माझे नेहमीच असे म्हणणे आहे की एखादी कलाकृती मग तो लेख असेल, काव्य असेल, पुस्तक असेल ते ही विशेष योग/ प्रारब्ध घेऊन येतात याला वरील ग्रहयोग पाहता पुष्टी मिळते.


 आणखी एक विशेष गोष्ट मी अभ्यासली ती म्हणजे बाबूजी आणि गदिमा या दोघांच्याही पत्रिकेत गुरु कर्क राशीत( उच्च राशीत)  आढळले.


हे सगळं आपणाशी फोनवर बोलता आलं नाही, तुम्ही माझ्यासाठी जी २ मिनीटे दिलीत ती मी कधीच विसरणार नाही. 

' फुलले रे क्षण माझे ' असंच म्हणता येईल.

 तुम्ही संगीत दिलेली , सांज ये गोकुळी, गगना गंध आला, फिटे अंधाराचे जाळे ही मला विशेष आवडणारी गाणी. 


  तुमच्याशी बोलून, तुमचा आवाज ऐकून  जे वाटलं ते एका वाक्यात सांगायचं झालं तर


'स्वराधीन आहे जगती, पुत्र बाबूजींचा'


धन्यवाद 🙏


📝अमोल केळकर

आषाढ शु. नवमी

१८/०७/२१


इतरांसाठी टिप: सोशल मिडियावर चांगले वाचले, ऐकले की ते पुढे ढकलण्या बरोबरच ज्याने लिहिले आहे त्यांना कलाकृती आवडल्याचे  आवर्जून कळवा.


 काय सांगावे मला मिळाली तशी संधी तुम्हालाही मिळेल ☺️

Thursday, July 15, 2021

समांतर


 "समांतर" ह्या मराठी वेब सिरीजला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे ( अत्यंत चांगले कथाबीज असताना व्हल्गर/ शिवराळ भाषा आणि बोल्ड सिन्सची एवढी जास्त गरज नव्हती हे प्रामाणिक मत.  असो) 


या मालिकेत  दोन व्यक्तींचे आयुष्य समांतर आहे असे दाखवले आहे म्हणजे  दोन व्यक्तींच्या पत्रिका सारख्या आहेत/ असतात असा उल्लेख झाल्याचे स्मरते. त्यातील एकाचा भूतकाळ आत्ता एकाचा वर्तमान म्हणून घडतोय अशी काहीशी कथा.


खरंच दोन व्यक्तीच्या पत्रिका सारख्या असू शकतात का?  तर जास्त खोलात ( म्हणजे ग्रहांवरून अंश, नवमांश. वगैरे) न शिरता असे म्हणता येईल की साधारण २ ते सव्वा दोन दिवस चंद्र एकाच राशीत असताना आणि इतर कुठल्याही ग्रहांचे राशी बदल होत नसताना, त्या दोन एक दिवसात एकाच वेळेवर. ( किंवा एकाच लग्न राशीवर )जन्म घेणाऱ्यांच्या पत्रिका दिसायला अगदी सारख्या दिसतात.

म्हणजे लग्न रास , प्रत्येक भावातील रास,  प्रत्येक भावातील ग्रह एकदी एकसारखे.  


आता एक महत्वाची गोष्ट जुळ्या मुलांच्या कुंडल्या सुध्दा सारख्या दिसत असल्या तरी त्यांचे प्रारब्ध वेगळे घडते,  त्यामुळे पत्रिका दिसताना सारख्या असल्या तरी भविष्य सारखे नसतेच


आता समांतर मालिकेत दाखवलेल्या प्रमाणे एखाद्यावेळची वर्तमानातील ग्रहस्थिती  भूतकाळात तशीच्या तशी असू शकेल का, ? ( तशी असली तरच दोन व्यक्तींचे प्रारब्ध/ घडणाऱ्या घटना एकसारख्या असू शकतील असे म्हणता येईल)


यासाठी मी माझी स्वतःची पत्रिका घेतली. पत्रिकेतील सगळ्यात हळू भ्रमण करणारे शनी महाराज कर्क राशीत , गुरु मिनेत, रवि - मकरेत , केतू मेषेत तर राहू तुळेत. 


आता यापूर्वी  शनी कर्केत,  रवि मकरेत अशी combinations , तीस तीस वर्षे मागे जाऊन पाहिली. 

शनी, रवि, चंद्र सोडून इतर कुठलेही ग्रह पाहिजे त्या राशीत सापडले नाही.


मग पुढे जाऊन पाहिले तर २०३५ ला शनि, रवि, गुरु, चंद्र  पाहिजेत त्या राशीत ( फेब्रुवारी ७६ सारखे) सापडले

पण आयडेंटिकल पत्रिका , सर्व ग्रह फेब्रु ७६ ग्रहस्थिती प्रमाणे  मिळाले नाहीत


तात्पर्य हेच की प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. मागील जन्माच्या कर्मानुसार या जन्मात त्या व्यक्तीच्या वाट्याला प्रारब्ध्द भोगावे लागत असेल. कदाचित मागील जन्म,  त्या जन्मातील काही घटना आठवतही असतील  पण अगदी जशाच्या तशा घटना घडणे हे फक्त वेब सिरीज मध्येच काल्पनिक गोष्ट म्हणून ठिक आहे. 


ज्योतिष अभ्यासकांच्या पहाण्यात अशा काही समांतर कुंडल्या ( ६०-७० वर्षाच्या फरकाने)  आल्या असल्यास अवश्य शेअर कराव्यात तसेच प्रत्यक्षात 'समांतर' कथानक शक्य आहे का ? यावर ही मत द्यावे


📝 अ. अ. केळकर

१३/०७/२१

Wednesday, July 14, 2021

ठो_ठूस्स_ठुई


 ठो, ठूस्स, ठुई 📝


पुरुषांना जसे वय्यक्तिक स्वातंत्र्य असते त्याप्रमाणे समस्त महिला वर्गालाही असावे याबाबत अजिबात दुमत नाही.


 पण तरीही मुळात "शालीनता" ही जी आपल्या संस्कृतीची अभिमानास्पद ओळख आहे ती तमाम बंधू- भगिनींनी आचरणात आणायला काय हरकत आहे? विशेषतः सार्वजनीक ठिकाणी/ सार्वजनीक  मंचावर वावरताना 


 तुमच्या घरात तुम्ही काय वाट्टेल ते करा पण तोच घरातील एखादा व्हिडिओ सावर्जनीक सोशल मिडियावर टाकताना काळजी घेणे आवश्यक नाही वाटत? 


( इथे पुरुषांनीही एखाद्या बीचवर कसे पळावे हा त्यांचा वय्यक्तिक मुद्दा असला तरी संस्कृती जपणूक/ सभ्यता  ही केवळ स्त्रीयांची  मक्तेदारी नाही याची नोंद घेण्यास हरकत नाही)


या सगळ्याचा संबंध फिल्म इंडस्ट्री,मनोरंजन इंडस्ट्रीशी असेल आणि त्यातून प्रसिद्धी मिळवायची असेल तर गोष्ट वेगळी. त्यासाठी इतर ही अनेक मार्ग आहेत. मालिका/ सिनेमांचे ट्रेलर,जहिराती इ इ आणि वेळोवेळी तो अवलंबला जातो. त्यावेळी 'शालीनता" हा मुद्दा आणला जात नाही कारण  प्रेक्षकांपासून, कलाकार, दिग्दर्शक , निर्माता यांच्यापर्यंत  भूमिकेची गरज/ स्क्रिफ्ट ची गरज या नावाने सगळं चालून जातं. 


तेंव्हा  तुमचे वय्यक्तिक, घरगुती स्वातंत्र्य सोशली किती, कशा पध्दतीने आणायचं हे कळणे महत्वाचे. अर्थात चर्चा होणे हेच प्रयोजन असेल तर काही हरकत नाही.


 आमच्या संस्कृती / परंपरा लयाला जात आहेत असे म्हणत  नंतर गळे काढून उपयोग नाही. आपणच याला जबाबदार ठरु


📝 अमोल केळकर

१५/०७/२१


#ठो_ठूस्स_ठुई


टिप: सुजीत भोगले यांचा समाजाला 'आरसा' दाखवणारा मुद्देसूद लेख मिळाल्यास अवश्य वाचा.

Sunday, July 11, 2021

हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला.


 मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे -  🛣️ एक प्रवास


( 📝मुळ संकल्पना :- शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेले आणि सुनील गावसकर यांनी गायलेले 'हे जीवन म्हणजे क्रिकेटराजा हुकला तो  संपला' हे गाणे)


या एक्सप्रेस-वे वर थांबायाला वेळ कोणाला?

हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला


अफाट अशा हायवे वरती येशी वेळो वेळी

मार्ग मोकळा दिसू लागता, ५ वा गिअर खेळी.

वेग घेई मग मोटरगाडी, फलक मागे फेकी

भवताली तुला मागे धाडाया, जो तो फासे टाकी

मार्गे टपला "टोल-भक्षक" तुझा उधळण्या डाव

फास्ट-टँग बसवशील तर, मिळेल तुजला भाव


चतुर आणि सावध जो जो तोच इथे रमला

हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला.


( कळंबोली सुटल्यावर सभोवार पहावे तर दिसतात माथेरान, कर्नाळा ची डोंगररांग. मागे पडत जाणारे ट्रक, बस, ट्रेलर,कंटेनर्स . 

ओव्हरटेक करुन पुढे जाणारी करकरीत नवीन अँटोमॅटीक गाडी वेगाच्या उन्मादात,धावणारी , पळणारी. 

शेजार शेजारच्या दोन अवजड वाहनाच्या टप्प्यात त्यांचा, वेग गळून जातो. स्पिड लिमीट ओलांडल्याच्या  जयघोषाच्या जल्लोषातील हवाच सारी निघून जाते.इकडून तिकडे लेन कटिंग करणा-यांना क्षणात आपल्या रांगेत कुणी जागा देत नाहीत....)


असा इथल्या दरबारातील न्याय सदा आगळा

हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला.


तू चालवत असता लाईट-हाॅर्नचे नारे

या हायवेवरचे नकोच विसरू वारे

फटकार अचूक टर्न, "अमृतां-जनाचा"

वाहतूक असे रे जणू डोंगर थांबायचा


निरंतर राहील तुझी आठवण इथल्या खड्याखड्याला

हा हायवे म्हणजे वेगाचा राजा, थांबला तो संपला.


(चालक 🚗) अ.अ.केळकर 

१२/०७/२१

Thursday, July 8, 2021

आषाढस्य प्रथमदिवसे


 

आषाढस्य प्रथमदिवसे 🌧️

योग जुळला विकेंडचा

कुटुंबासह लोणावळा-खंडाळा 

बेत ठरला मेघांचा...


बायको घरीच असल्याने

कालिदासाने दिली परवानगी

बोर- घाटातूनच वेगवेगळ्या दिशेला

ढगांची झाली रवानगी


कुणी पोहोचले टायगर- पॉईंट

कुणी धबधब्यात मारला सूर

नेहमीपेक्षा जास्त वाहतूक कोंडीने

त्यांच्याही गाड्यातून निघाला धूर


खंडाळा ते नारायणी धाम

भूशी डॅमलाही ढग जमले

 लोणावळ्याचे नेहमीचे वारकरी

लॉकडाऊन मुळे  घरीच बसले


निसर्ग गेला आनंदून

माणसांचा नव्हता त्रास

आषाढस्य प्रथमदिवसे

मेघदूतांची झाली पिकनिक खास


अ.अ.केळकर 📝

🌧️ ०९/०७/२०२१ 

 ज्येष्ठ अमावस्या


#पाऊले_चालती_लोणावळ्याची_वाट

नाही नेत्यांची मोजणी


 https://youtu.be/FfmsEr9ehVE


बा भ बोरकरांच्या स्मृतिनिमित्त.....


( त्यांची माफी मागून 🙏)


नाही नेत्यांची मोजणी

नाही खात्यांची टोचणी

दिली शपथेवर वाणी


कुणाला हा लाभ-भाग

 दिल्लीसाठी पाठलाग

आम्ही हो मंत्र्यांचे  चिराग


आम्हा मिळे नाव-रूप

आम्ही विकास स्वरूप

असा नारा होई खूप


को(क)णातल्या  पानाफुला 🌷

पाही सर्वांग सोहळा

धनुष्य- बाणाचीच कळा 🏹


नाही नेत्यांची मोजणी

नाही खात्यांची टोचणी

दिली शपथेवर वाणी


- अ. अ. केळकर 

📝०८/०७/२१

Related Posts Plugin for WordPress, Blogger...