श्री श्रीधरजी,
सर्वप्रथम अत्यंत आभारी की मला आपणाशी फोनवर बोलण्याची संधी आपण दिलीत 🙏. ग्रंथयात्रेच्या ३७ व्या भागात अर्चना ताईंनी 'गीतरामायण ' बद्दल माहिती सांगितली. त्यांना हा भाग आवडल्याचे मी कळवले, त्यांनी ती प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचवली. रात्री अर्चना ताईंनी मला तुमचा नंबर पाठवून तुमच्याशी बोलायला सांगितले आणि काल आपले बोलणे झाले. एकदम भारी वाटलं.
प्रत्यक्षात खूप काही बोलायचे ठरवले होते पण ऐनवेळी जास्त काही सुचले नाही म्हणून मनातले आता लिहून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे.
सर्वप्रथम ग्रंथयात्रेत तुम्ही जी माहिती सांगितलीत त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलची आठवण विशेष भावली. 'पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा' हे गाणे ऐकताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. ह्या गाण्यातील
'अयोध्येस हो तू राजा, रंक मी वनीचा'
ह्या वाक्याचा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रत्यक्ष जीवनाशी कसा संबंध लागतो हे क्रांतीकारी रसग्रहण मला फार आवडले.
सुदैवाने माझ्याकडे बा.भ. बोरकरांचे प्रस्तावना असलेले गीतरामायणाचे छापील पुस्तक आहे, किंमत २ रु. यावरून एका मराठी मालिकेतील एक वाक्य आठवते,
"दोन रूपये भी बहुत बडी चिज होती है बाबू " खरंच हा एक अत्यंत अमोल ठेवा आहे असे मी म्हणेन
"गीतरामायण" हे जे चिरंतन काव्य निर्माण झाले त्याचे श्रेय गदिमा आणि बाबूजींचेंच तरीही या दोघांनीही वेळोवेळी असे म्हटले आहे की, हे कार्य त्यांच्याकडून नियतीने/ एका विशेष शक्तीने करवून घेतले याचा उल्लेख आपण ही केलात.
याबाबत थोडेसे
प्रभू श्रीरामांची कर्क रास, पुष्य नक्षत्र. चंद्र-गुरु कर्केत तर शनी महाराज तुळ या उच्च राशीत .
ग्रंथयात्रेच्या कार्यक्रमात तुम्ही सांगितले की १ एप्रिल १९५५ ला रामनवमीच्या दिवशी हे गीतरामायण पहिल्यांदा प्रसारित झाले. त्या दिवशीचा ग्रहयोग पाहिला असता त्यादिवशी कर्क रास- पुष्य नक्षत्र आणि तुळेचा शनी असा समांतर ग्रहयोग माझ्या पहाण्यात आला. नक्षत्रात पुष्य नक्षत्र हे सगळ्यात शुभ नक्षत्र मानले जाते. ज्योतिष अभ्यासक म्हणून माझे नेहमीच असे म्हणणे आहे की एखादी कलाकृती मग तो लेख असेल, काव्य असेल, पुस्तक असेल ते ही विशेष योग/ प्रारब्ध घेऊन येतात याला वरील ग्रहयोग पाहता पुष्टी मिळते.
आणखी एक विशेष गोष्ट मी अभ्यासली ती म्हणजे बाबूजी आणि गदिमा या दोघांच्याही पत्रिकेत गुरु कर्क राशीत( उच्च राशीत) आढळले.
हे सगळं आपणाशी फोनवर बोलता आलं नाही, तुम्ही माझ्यासाठी जी २ मिनीटे दिलीत ती मी कधीच विसरणार नाही.
' फुलले रे क्षण माझे ' असंच म्हणता येईल.
तुम्ही संगीत दिलेली , सांज ये गोकुळी, गगना गंध आला, फिटे अंधाराचे जाळे ही मला विशेष आवडणारी गाणी.
तुमच्याशी बोलून, तुमचा आवाज ऐकून जे वाटलं ते एका वाक्यात सांगायचं झालं तर
'स्वराधीन आहे जगती, पुत्र बाबूजींचा'
धन्यवाद 🙏
📝अमोल केळकर
आषाढ शु. नवमी
१८/०७/२१
इतरांसाठी टिप: सोशल मिडियावर चांगले वाचले, ऐकले की ते पुढे ढकलण्या बरोबरच ज्याने लिहिले आहे त्यांना कलाकृती आवडल्याचे आवर्जून कळवा.
काय सांगावे मला मिळाली तशी संधी तुम्हालाही मिळेल ☺️
No comments:
Post a Comment