निर्विघ्नं कुरु मे देव !
काकूंचा फोन येऊन आठवडा होऊन गेलेला,निदान या आठवड्यात तरी उत्तर द्यायला पाहिजे होते. खरं म्हणजे विचारलेला प्रश्ण तसा नियमितच होता. लग्न होईल का? सगळं व्यवस्थित होईल ना?
लग्न होण्यासंबंधीचे नियम पडताळून, महादशा - अंतर्दशा ची संगत लावून साधारण उत्तर ही तयार होते
पण ...
काकूंनी सांगितलेली पार्श्वभूमी. त्या काही बोलल्या नसत्या तर, सगळं व्यवस्थित होईल, योग आहेतच ,अमूक वर्षी अमूक दशेत, अमूक ग्रहांच्या विदशेत २,७,११ ही तिन्ही स्थाने मिळतायत , करा सुरवात मुली बघायला ' असं लिहून पाठवायला फारतर एखाद दुसरा दिवस लागला असता.
पण त्या बहिण -भावांची कथा ऐकल्यावर तो हादरला. वडील नाहीत. आई नुकतीच कोरोनात गेली. लहान बहिण डिप्रेशन मधे, स्वतःला चांगली नोकरी पण लग्न होत नाही आहे.
आणि ही परिस्थिती, काकूंनी न सांगता आपल्याला पत्रिका बघून का ओळखता आली नाही? याचे वैषम्य त्याला जास्त होते.
दुसऱ्यांचे प्रारब्ध बघता बघता आपल्यासाठी ही नियतीची योजना असते आणि त्याप्रमाणेच जावे लागते याची जाणीव ही घटना देऊन गेली.
ग्रह अनुकूल असूनही हो 'लग्न' होईल हे ठाम पणे कळवणे त्याच्या जीवावर येत होते. तुझ्या मुलीसाठी असं स्थळ आले असते तर तू स्वीकारले असते असतेस का? हा मनातील प्रश्ण ही त्याला अस्वस्थ करत होता.
यासाठीस तो अजून उत्तर द्यायचा थांबला होता. आज सर्व कन्सल्टिंग बंद ठेवायचे त्याने आधीच ठरवले होते.
आज चतुर्थीची आवर्तने करताना दोन आवर्तनं त्या बहिण-भावांसाठी म्हणायची आणि परत एकदा पत्रिकेतील 'निर्णायक घटक' शोधायचे आणि काकूंना या आठवड्यात उत्तर द्यायचेच हे ठरवून त्याने 'वक्रतुंड महाकाय ' म्हणायला सुरवात केली
"निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा!" हे थोड्या मोठ्या आवाजात म्हणले गेलेलं त्याच्या कानाला जाणवलं
( अमोल)
No comments:
Post a Comment